India Tour Of Australia 2020 : ‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अंजिक्य विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८५*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतानं चौथ्या कसोटी सामन्यात तीन  गड्यांनी विजय मिळवला आहे. या विजयासाह भारतानं बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ नं जिंकली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर भारतीय संघानं फिनिक्स पक्षाप्रमाणे कसोटी मालिकेवर नाव कोरलं आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं ८ गड्यानं विजय मिळवला. तर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीनं फलंदाजी करत तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळाच्या बळावर भारतीय संघानं विजय मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघानं शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचं कठीण आव्हान पार केलं आहे.

अखेरच्या पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर रोहित शर्मानं आपली विकेट फेकली. त्यानंतर शुबमन आणि पुजारा यांनी संयमी फलंदाजी करत ११४ धावांची भागिदारी केली. गिलं ९१ धावांवर बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि पुजारा यांनी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजिंक्य रहाणे २४ धावांवर बाद झाला. अजिंक्य राहणेनंतर पुजाराही ५६ धावांवर बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंतनं सामन्याची सर्व सुत्रं आपल्याकडे घेतली. पंतनं मयांकसोबत विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोक्याच्या क्षणी मयांकनं (९) आपली विकेट फेकली. मयांकनंतर सुंदरनं झटपट काढल्या. मात्र विजयाच्या समीप पोहचल्यानंतर सुंदर(२२ ) आणि शार्दुल ठाकूर (२) यांनी विकेट फेकली. मात्र ऋषभ पंतनं ८९ धावांची खेळी करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

३२ वर्षानंतर गाबावर ऑस्ट्रेलियाचा पराभव-

ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या मैदानावर मागील ३२ वर्षांपासन ‘अजिंक्य’ असणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभवाची चव भारतानं चाखायला लावली आहे. धावांचा यशस्वी पाठलाग करताना चौथ्या डावांत गाबाच्या या मैदानावर भारतीय संघानं नवीन विक्रम प्रस्थापीत केला आहे. याआधी २३६ ही सर्वोत्तम धावसंख्या होती. भारतानं हा विक्रम मोडीत काढला.

रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघ अजिंक्यच

मराठमोळया अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाला आतापर्यंत एकदाही पराभव पाहावा लागला नाही. अजिंक्य रहाणेनं २०१८ मध्ये  अफगानिस्तान विरोधात पहिल्यांदा भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात एका सामन्यात भारताला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. रहाणेच्या नेतृत्वातील पाचही सामन्यात भारतीय संघ अजिंक्य आहे.

Live Blog

Highlights

    14:47 (IST)19 Jan 2021
    सचिन तेंडुलकरनं केलं अभिनंदन

    ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर मास्टर बास्टर सचिन तेंडुलकरने ट्विट करुन अभिनंदन केलं. तो म्हणाला,  ब्रिस्बेन कसोटीतील प्रत्येक सत्रात भारतीय संघाला एक नवा हिरो मिळाला. मार बसल्यानंतर प्रत्येकवेळी आपण नेटाने उभे राहिलो आणि आणखी चांगली कामगिरी करुन दाखविली. निष्काळजीपणे नव्हे तर निर्भीडपणे कसे खेळायचे याच्या कक्षा आपण आणखी रुंदावल्या. आपण दुखापत आणि अनिश्चिततेला संयम आणि आत्मविश्वासाने प्रत्युत्तर दिले. हा विजय ऐतिहासिक आहे.  

    14:37 (IST)19 Jan 2021
    वृद्धीमान साहाचा शायराना अंदाज
    14:35 (IST)19 Jan 2021
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन

    भारताने चौथ्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियावर मिळविलेल्या जोरदार विजयाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्णधार अजिंक्य रहाणे व टीमचे अभिनंदन केले आहे. गाबाच्या मैदानावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील असे त्यांनी म्हटले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर देखील  भारतीय संघानं दुर्दम्य आशावाद आणि जिद्द याच्या जोरावर संपूर्ण कसोटी मालिका जिंकली. धावांचा यशस्वी पाठलाग करताना भारतीय संघानं या मालिकेत नवीन विक्रम प्रस्थापीत केला ही देशातील सर्व क्रिकेटवीरांसाठी अभिमानाची बाब आहे असेही मुख्यमंत्री म्हणतात.

    14:34 (IST)19 Jan 2021
    Ind vs Aus : भारताने सामना जिंकल्यानंतर Google चे CEO ही झाले खूष; ‘ते’ खास ट्विट झालं व्हायरल

    सामाना संपल्यानंतर सुंदर पिचाई यांनी ट्विटरवरुन भारतीय संघाला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्यात. हा भारताचा आतापर्यंतच्या सर्वोत्तम मालिका विजयांपैकी एक विजय आहे. भारतीय संघांचे अभिनंदन आणि ऑस्ट्रेलियन संघही छान खेळला. खूप छान मालिका झाली, असं ट्विट सुंदर यांनी केलं आहे. सुंदर यांचं हे ट्विट सध्या व्हायरल झालं असून अर्ध्या तासाच्या आत जवळजवळ पंधरा हजार जणांनी ते रिट्विट केलं आहे.

    14:33 (IST)19 Jan 2021
    शरद पवारांचे ‘टीम इंडिया’च्या विजयावर ट्विट, म्हणाले…

    भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर शरद पवार ट्विट करत म्हणाले, “दमदार अशा विजयासाठी टीम इंडियाचं खूप अभिनंदन! ही एक ऐतिहासिक घटना आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. गाबाच्या मैदानावर ३२ वर्षांनी ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाचा सामना करायला भारतीय संघाने भाग पाडले. पुन्हा एकदा साऱ्यांचे अभिनंदन!”

    14:33 (IST)19 Jan 2021
    दादा खुश हुआ… BCCI अध्यक्षांनी विजयानंतर भारतीय संघाला दिला एक सुखद धक्का

    ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने विजयश्री खेचून आणण्याऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन करतानाच त्यांना एक भन्नाट गिफ्टही दिलं आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनीच यासंदर्भातील घोषणा केली आहे. बीसीसीआयकडून भारतीय टीमला पाच कोटींचा बोनस जाहीर करण्यात आला आहे.

    14:28 (IST)19 Jan 2021
    भारत आशियाचा किंग

    ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत पराभव करण्यात भारतीय संघ आशिया खंडामध्ये अव्वल आहे.  कसोटी इतिहासात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलिायत आतापर्यंत ९ वेळा हरवलं आहे. पाकिस्तान संघानं ४ वेळा हा कारनामा केला आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांना कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियात एकही विजय मिळवता आला नाही. 

    14:08 (IST)19 Jan 2021
    WTC : ऑस्ट्रेलियाला खाली खेचत भारत अव्वल स्थानावर

    World Test Championship : ब्रिस्बेन कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा तीन गड्यांनी पराभव करत बॉर्डर गावसकर कसोटी मालिका २-१ नं खिशात घातली आहे. या ऐतिहासिक विजयासह भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. .. वाचा सविस्तर

    14:06 (IST)19 Jan 2021
    ‘गाबा’चं घर खाली! कांगारुंवर ७० वर्षांनी नामुष्की, टीम इंडियाने रचला इतिहास

    गाबाच्या मैदानात कधी पराभव बघितलेला नाही…गाबा स्टेडियममध्ये सलग २८ कसोटी सामने सहज जिंकलेत…अशाप्रकारच्या फुशारक्या मारणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला टीम इंडियाने जबरदस्त हादरा दिला आणि कांगारूंना चारीमुंड्या चित केलं. मराठीत ‘गर्वाचं घर खाली’ अशी म्हण आहे, पण हा ऐतिहासिक कसोटी सामना जिंकून भारताने कांगारुंचं ‘गाबा’चं घर खाली केलं असंच म्हणावं लागेल. ( वाचा सविस्तर )

    13:30 (IST)19 Jan 2021
    लागोपाठ तिसऱ्यांदा चषकावर कोरलं नाव

    बॉर्डर-गावसकर चषकावर लागोपाठ तिसऱ्यांदा भारतीय संघानं नाव कोरलं आहे. तर  ऑस्ट्रलियात सलग दुसऱ्यांदा भारतीय संघानं कसोटी मालिका जिंकली आहे. २०१८-१९ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतानं २-१ नं कसोटी मालिका जिंकली होती.  २०१६-१७ मध्ये यजमान भारतानं ऑस्ट्रेलियाचा २-१ नं पराभव केला होता.  

    13:28 (IST)19 Jan 2021
    ३२ वर्षानंतर गाबावर ऑस्ट्रेलियाचा पराभव-

    ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या मैदानावर मागील ३२ वर्षांपासन ‘अजिंक्य’ असणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभवाची चव भारतानं चाखायला लावली आहे. धावांचा यशस्वी पाठलाग करताना चौथ्या डावांत गाबाच्या या मैदानावर भारतीय संघानं नवीन विक्रम प्रस्थापीत केला आहे. याआधी २३६ ही सर्वोत्तम धावसंख्या होती. भारतानं हा विक्रम मोडीत काढला.

    13:27 (IST)19 Jan 2021
    रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघ अजिंक्यच

    मराठमोळया अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाला आतापर्यंत एकदाही पराभव पाहावा लागला नाही. अजिंक्य रहाणेनं २०१८ मध्ये  अफगानिस्तान विरोधात पहिल्यांदा भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात एका सामन्यात भारताला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. रहाणेच्या नेतृत्वातील पाचही सामन्यात भारतीय संघ अजिंक्य आहे.

     
    13:10 (IST)19 Jan 2021
    ऑस्ट्रेलियाचं 'गाबा'चं घर खाली!! भारताचा ऐतिहासिक विजय

    सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८५*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतानं चौथ्या कसोटी सामन्यात तीन  गड्यांनी विजय मिळवला आहे. या विजयासाह भारतानं बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ नं जिंकली आहे.

    12:54 (IST)19 Jan 2021
    सामना भारताच्या खिशात

    ऋषभ पंत आणि सुंदर्चाय फटकेबाजीच्या बळावर भारतीय संघानं  विजयाच्या समीप पोहचला आहे. भारताला विजयासाठी ३२ चेंडूत फक्त १५ धावांची गरज आहे. पंत ७६ धावांवर खेळत आहे. 

    12:48 (IST)19 Jan 2021
    कसोटीत टी-२०चा थरार; पंतची ‘सुंदर’ फटकेबाजी

    १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या नॅथन लायनाविरोधात ऋषभ पंतनं फटकेबाजी केली आहे. पंत-सुंदरनं लायनलाच्या एका षटकांत १५ धावा वसूल करत सामना भारताच्या बाजूनं झुकवला. भारताला विजयासाठी ३६ चेंडूत २४ धावांची गरज आहे. ऋषभ पंत ७१ आणि सुंदर १९ धावांवर खेळत आहेत. 

    12:41 (IST)19 Jan 2021
    भारतीय संघाला विजयासाठी ४९ धावांची गरज

    भारतीय संघाला विजयासाठी ४६ चेंडूत ४९ धावांची गरज आहे. ऋषभ पंत आणि वॉशिंगटन सुंदर मैदानावर आहेत. 

    12:19 (IST)19 Jan 2021
    कमिन्सचा चौथा बळी, मयांक अगरवाल बाद

    पॅट कमिन्सनं भेदक मारा करत भारतीय संघासमोरील अडचणीत वाढ केली आहे. कमिन्सनं मयांकला बाद करत सुस्थितीत असणाऱ्या भारताला मोठा धक्का दिला आहे. मयांक ९ धावांवर बाद झाला आहे. भारतीय संघाला विजयासाठी अद्याप ६३ धावांची गरज आहे. ऋषभ पंत ५७ धावांवर खेळत आहे.

    12:08 (IST)19 Jan 2021
    भारताला विजयासाठी ९० चेंडूत ६९ धावांची गरज

    भारतीय संघाला विजयासाटी ९० चेंडूत ६९ धावांची गरज आहे. तर ऑस्ट्रेलियाला सहा विकेटची गरज आहे. ऋषभ पंतनं अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सध्या पंत ५१ आणि मयांक ९ धावांवर खेळत आहे.

    12:02 (IST)19 Jan 2021
    ऋषभ पंतची अर्धशतकी खेळी, भारताला विजयासाठी ७४ धावांची गरज

    ऋषभ पंतनं मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाच्या विजयाचा आशा पल्लवीत केल्या आहेत. पंतनं १०० चेंडूचा सामना करत एक षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीनं अर्धशतकी खेळी केली. पंतचं या मालिकेतील हे दुसरं अर्धशतकं आहे. भारताला विजयासाठी अद्याप ७४ धावांची गरज आहे.

    11:50 (IST)19 Jan 2021
    ब्रिस्बेनमध्ये हलक्या सरी

    चौथी कसोटी सामना रंगातदार स्थितीत पोहचला आहे. भारतीय संघाला विजयासाठी ८७ धावांची गरज आहे तर ऑस्ट्रेलियाला सहा विकेटची गरज आहे. मात्र, ब्रिस्बेनमध्ये हलक्या सरी कोसळत आहे. सध्या ऋषभ पंत ३९ आणि मयांक अगरवाल ४ धावांवर खेळत आहेत.


    11:43 (IST)19 Jan 2021
    भारताला मोठा धक्का चेतेश्वर पुजारा बाद

    संयमी फलंदाजी करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला कमिन्सनं बाद केलं. कमिन्सनं नवीन चेंडूवर भारताला धक्का दिला. दुसऱ्या डावांत कमिन्सची ही तिसरी विकेट आहे. भारतीय संघाला विजयासाठी अद्याप १०० धावांची गरज आहे. ऋषभ पंत आणि मयांक अगरलवाल यांच्यावर भिस्त असणार आहे

    11:40 (IST)19 Jan 2021
    भारताला विजयासाठी १०० धावांची गरज

    भारतीय संघानं ७९ षटकांमध्ये २२८ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताला विजयासाठी २० षटकांत १०० धावांची गरज आहे. ऋषभ पंत ३४ आणि चेतेश्वर पुजारा ५६ धावांवर खेळत आहेत. पुजारा-पंत यांनी चौथ्या गड्यासाठी ६१ धावांची भागिदारी केली आहे.

    11:33 (IST)19 Jan 2021
    पुजारानं मोडला गावसकरांचा खास विक्रम -

    बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजारानं सर्वाधिक २०० पेक्षा जास्त चेंडू खेळण्याचा सुनील गावसकर यांचा विक्रम मोडीत काढला आहे. पुजारानं नवव्यांदा २०० पेक्षा जास्त चेंडू खेळले आहेत. गावसकर यांनी सातवेळा तर तेंडुलकरनं सहावेळा २०० पेक्षा जास्त चेंडू खेळले आहेत.

    11:30 (IST)19 Jan 2021
    पुजाराचं सर्वात संथ अर्धशतक

    चेतेश्वर पुजारानं आपल्या कारकिर्दीतील सर्वात संथ आर्धशतक केलं आहे. ब्रिस्बेन कसोटी सामन्यात पुजारानं १९६ चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. भारतीय संघाला विजयासाठी २३ षटकांत १०४ धावांची गरज आहे. 

    11:16 (IST)19 Jan 2021
    चेतेश्वर पुजाराचं संयमी अर्धशतक

    भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारानं संयमी अर्धशतक झळकावलं आहे. पुजारानं २०० चेंडूचा सामना करताना आपलं अर्धशतक पुर्ण केलं. भारतीय संघाला विजयासाठी २६ षटकांत १११ धावांची गरज आहे. पुजारा आणि ऋषभ पंत (३१) खेळत आहेत. पुजारा-पंत यांच्या फलंदाजीमुळे भारतीय संघाला विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

    11:06 (IST)19 Jan 2021
    ऋषभ पंतचा खणखणीत षटकार

    ऋषभ पंत यानं नॅथन लायन याला खणखणीत षटकार लगावत आपला इरादा स्पष्ट केला आहे. पंत सध्या ५२ चेंडूमध्ये २६ धावांवर खेळत आहे. भारतीय संघाला विजयासाठी अद्याप १२१ धावांची गरज आहे.

    10:44 (IST)19 Jan 2021
    भारतीय संघाला विजयासाठी ३४ षटकांत १४५ धावांची गरज

    भारतीय संघाला ऐतिहासिक विजयासाठी ३४ षटकांत १४५ धावांची गरज आहे. ६६ षटकानंतर भारतीय संघानं तीन गड्यांच्या मोबदल्यात १८३ धावा केल्या आहेत. ऋषभ पंत १० आणि अनुभवी पुजारा ४३ धावांवर खेळत आहेत.  

    10:40 (IST)19 Jan 2021
    भारतीय संघाकडे इतिहास रचण्याची संधी

    ब्रिस्बेनमध्ये भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे. या मैदानावर आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा संघ पराभूत झालेला नाही. पंत-पुजारानं संयमी फलंदाजी केल्यास भारतीय संघ हा विक्रम मोडण्याची संधी आहे. कोणतेही विक्रम मोडण्यासाठीच असतात... भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा अभेद्य किल्ला भेदणार का?

    मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
    Web Title: India vs australia ind vs aus 4th test day 5 live score india tour australia nck
    First published on: 19-01-2021 at 10:33 IST