दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून विश्रांती दिलेल्या मुंबईकर पृथ्वी शॉ दुसऱ्या कसोटीलाही मुकणार आहे. दुखापतीतून पृथ्वी पूर्णपणे सावरला नसल्यामुळे त्याला विश्रांती दिली आहे. पर्थ कसोटीपूर्वी पृथ्वीने धावण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे चाहते आनंदात होते. मात्र, दुसऱ्या कसोटीसाठी १३ सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबईकर पृथ्वी शॉची निवड झालेली नाही.

सराव सामन्यावेळी झेल घेताना पृथ्वी शॉ जखम झाला होता. पायाला दुखापत झाल्यामुळे पहिल्या कसोटीला पृथ्वी मुकला होता. दुखापत अद्याप पूर्णपणे बरी न झाल्यामुळे दुसऱ्या कसोटीतूनही त्याला विश्रांती देण्यात आली आहे. पृथ्वीच्या अनुपस्थितीत राहुल आणि मुरली विजयने भारतासाठी डावाची सुरूवात केली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी पर्थवर डावाची सुरूवात करतील. पृथ्वी शॉला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. कोच रवी शास्त्री यांनी शॉ दुखापतीतून झपाट्याने सावरत असल्याचे म्हटले आहे. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, २६ डिसेंबर रोजी मेलबर्न येथे होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीमध्ये पृथ्वी शॉ खेळण्याची शक्यता आहे.

विंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मुंबईकर पृथ्वी शॉने पदार्पणातच शतक झळकावले होते.  पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरी करणारा पृथ्वी शॉ भारताचा १५वा खेळाडू ठरला होता. पदार्पणाच्या सामन्यात पृथ्वीने दमदार कामगिरी करत भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले होते. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये सराव सामन्यात दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटीला मुकावे लागले आहे.

(सराव सामन्यात सीमारेषेजवळ झेल टिपताना पृथ्वीच्या पायाला दुखापत झाली. यानंतर पृथ्वीला टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफने उचलून ड्रेसिंग रुममध्ये नेले.)

 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दुसरा कसोटी सामना पर्थ येथे १४ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यापूर्वी आज १३ जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या कसोटीतील विजयी संघातून रोहित शर्मा आणि आर. अश्विनला वगळण्यात आले आहे. तर रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांना संधी देण्यात आली आहे. पर्थची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात भारत चार वेगवागन गोलंदाजासह उतरण्याची शक्यता आहे.