भारताने नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरूद्धची कसोटी मालिका निर्विवाद वर्चस्व राखत जिंकली. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करत ‘व्हाइटवॉश’ दिला. तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर तर फॉलो-ऑन नंतरचा डाव १३३ धावांवर आटोपला. त्यामुळे एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवत भारताने मालिका ३-० ने जिंकली.

या मालिकेत मुंबईचे दोन शिलेदार चमकले. रोहित शर्माला प्रथमच कसोटीत सलामीवीर म्हणून संधी मिळाली. त्याने त्या संधीचे सोने करत दोन शतके आणि एक द्विशतक केले. रोहितला मालिकावीर घोषित करण्यात आले. रोहितव्यतिरिक्त मुंबईचा अजिंक्य रहाणे यानेदेखील चांगली कामगिरी करून दाखवली. आता अजिंक्य बांगलादेश विरूद्धच्या क्रिकेट मालिकेसाठी तयारी करत आहे. त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये तो एका मैदानावर धावण्याचा सराव करत आहे. त्या पोस्टमध्ये त्याने ‘कुटुंबीयांसमवेत छानपैकी वेळ घालवून झाला. आता पुन्हा परिश्रम घेण्याची वेळ आली आहे’, असे लिहिले आहे.

दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्यला फारशी चमक दाखवता आली नाही, पण दुसऱ्या सामन्यात मात्र त्याने दमदार अर्धशतक (५९) केले. तिसऱ्या सामन्यातदेखील त्याने ही लय कायम राखत शतक झळकावले. रोहितव्यतिरिक्त इतर फलंदाज ज्या डावात अपयशी ठरले, त्यावेळी अजिंक्यने दमदार ११५ धावांची खेळी करून दाखवली. तिसऱ्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनीही दमदार खेळ केला. त्यामुळे भारताला एक डाव आणि २०० हून अधिक धावांनी विजय मिळवणे शक्य झाले.