Ind vs Eng : इंग्लंडविरुद्धच्या अंतिम कसोटीत सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर भारताने ३ बाद ५८ धावांपर्यंत मजल मारली. धवन, पुजारा आणि कोहली झटपट बाद झाल्यामुळे सुरुवातीला भारताने २ धावात ३ बळी गमावले होते. मात्र त्यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे या जोडीने भारताला सावरले आणि दिवस संपेपर्यंत खेळपट्टीवर तग धरला. त्याआधी इंग्लंडने दुसरा डाव ८ बाद ४२३ धावांवर घोषित केला. अनुभवी कुकने १४७ तर कर्णधार रूटने १२५ धावा केल्या. आता सामन्याच्या एका दिवसाच्या शिल्लक राहिलेल्या खेळात भारताला विजयासाठी ४०६ धावांची तर इंग्लंडला ७ बळींची गरज आहे. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा एकाच षटकात पायचीत झाले. अँडरसनने दोनही बळी टिपले. नंतर कर्णधार विराट कोहलीदेखील शून्यावर बाद झाला. पण त्यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे या जोडीने भारताला अर्धशतकी मजल मारून दिली. त्याआधी इंग्लंडने दुसरा डाव ८ बाद ४२३ धावांवर घोषित केला आणि भारतापुढे ४६४ धावांचे लक्ष्य ठेवले. आजच्या पहिल्या सत्रात भारताच्या गोलंदाजांना एकही गडी बाद करता आला नाही. अनुभवी कुक आणि कर्णधार रूट यांनी शतके झळकावत २५९ धावांची भागीदारी केली. कूकने १४७ तर कर्णधार रूटने १२५ धावा केल्या. सलग दोन चेंडूंवर या दोंघांना नवोदित हनुमा विहिरीने बाद केले. त्याच्यानंतर बेअरस्टो (१८) आणि बटलर (०) देखील झटपट बाद झाले. त्यानंतर बेन स्टोक्सने ३६ चेंडूत ३७ धावांची झंझावाती खेळी केली. पण तोदेखील मोठा फटका खेळताना बाद झाला. अखेर करन बाद झाल्यानंतर इंग्लंडने डाव घोषित केला. भारताकडून जडेजा-विहारी यांनी ३-३ तर शमीने २ गडी बाद केले. दरम्यान, अनुभवी अॅलिस्टर कूक हा आपला आंतरराष्ट्रीय सामना खेळत असल्यामुळे हा सामना जिंकून आपल्या माजी कर्णधाराला विजयी निरोप देण्याच्या दृष्टीने इंग्लंडचा संघ सामना खेळत आहे. तर आधीच मालिका गमावल्यामुळे सामना जिंकून किमान दौऱ्याचा शेवट गोड करता यावा, यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील आहे.