भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला १ ऑगस्टपासून बर्मिंगहॅमच्या मैदानात सुरुवात होणार आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ बाजी मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मात्र त्याआधीच इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने भारतीय संघाला सूचक इशारा दिला आहे. “आयपीएलदरम्यान भारतीय संघातले बरेचसे खेळाडू माझे चांगले मित्र झाले आहेत. मात्र इकडे त्या मैत्रीचा काहीही उपयोग होणार नाही”, असं म्हणत बटलरने ही मालिका भारतासाठी सोपी नसेल याची आठवण करुन दिली आहे.

Cricinfo वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत बटलरने ही गोष्ट बोलून दाखवली आहे. आयपीएलचा हंगाम संपून आता बराच काळ उलटला आहे. त्यामुळे काही भारतीय खेळाडूंचा खेळ मी जवळून पाहिला आहे. याचा कसोटी मालिकेत आमच्या संघाला नक्कीच फायदा होईल. अनेक भारतीय खेळाडूंसोबत मी आयपीएलमध्ये खेळलोय, मात्र त्या गोष्टीचा इथे कोणताही परिणाम होणार नाही. कसोटी मालिकेत आम्ही प्रतिस्पर्धी म्हणूनच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहोत.

आयपीएलच्या अकराव्या हंगामात जोस बटलर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला होता. बटलरच्याच आक्रमक खेळीच्या जोरावर राजस्थानच्या संघाने अकराव्या हंगामात सर्वोत्तम ४ संघांमध्ये जागा मिळवली होती. १३ डावांमध्ये बटलरने ५४३ धावा पटकावत आपल्या संघाकडून सर्वाधिक धावा बनवण्याचा मान पटकावला होता. आयपीएलनंतर आस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वन-डे मालिकेतही बटलरने आक्रमक फलंदाजी केली होती.