भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या मते, भारताने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरावं. सध्याच्या घडीला रविचंद्रन आश्विन आणि कुलदीप यादव हे भारताचे सर्वोत्तम फिरकीपटू आहेत, या दोन्ही खेळाडूंना संघात जागा मिळायला हवी असंही अझरुद्दीनने म्हटलं आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडवर मात करण्यासाठी हा हुकमी एक्का ठरु शकतो असंही मत अझरुद्दीने व्यक्त केलं. १९८६ साली भारतीय संघाने इंग्लंडला त्यांच्याच देशात पराभवाचा धक्का दिला, अझरुद्दीन यावेळी भारतीय संघाचा हिस्सा होता.

अवश्य वाचा – ऋषभ पंतकडे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता – राहुल द्रविड

“जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडचा अपवाद वगळता इंग्लंडची गोलंदाजी तितकीशी भक्कम वाटत नाही. भारताचा संघ तुलनेत सरस आहे. त्यातही अँडरसन आणि ब्रॉड ही जोडी दुखापतीमधून सावरलेली असल्यामुळे त्यांना सूर पकडण्यासाठी वेळ जाईल. एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचे फलंदाज कुलदीपच्या जाळ्यात अडकले होते, कसोटी मालिकेतही याचा आपल्या संघाला फायदा होईल.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अझरुद्दीनने आपली बाजू मांडली.

रविंद्र जाडेजा संघात असताना कोणत्या निकषावर कुलदीपला संघात जागा मिळायला हवी असा प्रश्न विचारला असता, अझरुद्दीन म्हणाला “कुलदीप गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करतो आहे. संघात त्याची निवड होण्यासाठी इतकासा निकष पुरेसा आहे. रविंद्र जाडेजाला संघात जागा मिळेल अशी शक्यता वाटत नाही.” सध्याचा भारतीय संघ हा तंदुरुस्त असल्यामुळे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो सर्वोत्तम कामगिरी करेल अशी आशा बाळगायला हरकत नसल्याचं मत अझरुद्दीनने व्यक्त केलं.