टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करत ‘व्हाइटवॉश’ दिला. तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर तर फॉलो-ऑन नंतरचा डाव १३३ धावांवर आटोपला. त्यामुळे एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवत भारताने मालिका ३-० ने जिंकली.

भारताने या विजयासह कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखत २४० गुणांची कमाई केली. विशेष म्हणजे या अजिंक्यपद स्पर्धेतील इतर आठ संघांचे मिळून जेवढे गुण आहेत, त्या पेक्षाही जास्त गुण एकट्या भारताने कमावले आहेत. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे २४० गुण आहेत. न्यूझीलंड आणि श्रीलंका प्रत्येकी ६० गुणांवर आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया प्रत्येकी ५६ गुणांवर आहेत. तर विंडीज, बांगलादेश, आफ्रिका आणि पाकिस्तान यांनी अद्याप खाते उघडलेले नाही. त्यामुळे इतर ७ संघांचे मिळून २३२ गुण आहेत, तर भारताचे एकट्याचे २४० गुण आहेत.

दरम्यान, भारताच्या ४९७ धावांना प्रत्युत्तर देताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांत आटोपला. दुखापतग्रस्त एडन मार्क्रमच्या जागी खेळणारा झुबायर हामझा याने टेम्बा बावुमाच्या साथीने ९१ धावांची भागीदारी केली. हामझाने दमदार अर्धशतक ठोकले. तो ६२ धावांवर बाद झाला. इतर फलंदाजांची त्याला साथ मिळू शकली नाही.

पहिल्या डावातील अपयशामुळे आफ्रिकेवर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. त्यानंतर दुसऱ्या डावातही आफ्रिकेने खराब कामगिरी केली. डी कॉक, हामझा, बावुमा, हामझा आणि क्लासें या फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला अणि अवघ्या काही मिनिटात खेळ संपला.