दक्षिण आफ्रिकेच्या आगामी भारत दौऱ्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यांची ठिकाणं बदलण्यात आलेली आहेत. बीसीसीआयने आधी आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार, दुसरा कसोटी सामना १० ते १४ ऑक्टोबरदरम्यान रांची येथे खेळवण्यात येणार होता. याचसोबत तिसरा कसोटी सामना १९ ते २३ ऑक्टोबरदरम्यान पुणे येथे खेळवण्यात येणार होता.

मात्र रांची येथील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, झारखंड राज्यात दुर्गा पुजेचं आयोजन करण्यात येतं. या दरम्यान कसोटी सामन्याचं आयोजन आणि सामन्यासाठी सुरक्षा पुरवणं शक्य होणार नसल्याचं झारखंड क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयला कळवलं होतं. यानंतर क्रिकेट प्रशासकीय समिती आणि राज्य संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीनंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्याची ठिकाणं बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अवश्य वाचा – विराट कोहली सर्वोत्तम खेळाडू, इंग्लंडच्या माजी कर्णधाराकडून प्रशंसा

१५ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे नवीन बदलांनुसार, १० ते १४ ऑक्टोबरदरम्यान होणारा कसोटी सामना रांचीऐवजी पुणे तर १९ ते २३ ऑक्टोबरदरम्यानचा कसोटी सामना पुण्याऐवजी रांचीला खेळवण्यात येणार आहे.

अवश्य वाचा – Ind A vs WI A : युवा शुभमन गिलचं द्विशतक, भारताची सामन्यावर पकड