भारत आणि वेस्ट इंडिजयांच्यामध्ये आज मालिकेतील अखेरचा एकदिवसीय सामना होणार आहे. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ ने आघाडी घेतली आहे. तर एक सामना टाय झाला आहे. भारतीय संघ आज मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल तर वेस्ट इंडिजचा संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या प्रयत्नात असेल. गुरुवारच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या सामन्यात अनेक विक्रम होण्याची शक्यता आहे.

  • धोनीला भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी एक धावेची आवश्यकता आहे. धोनीने १२४ धावा आशियाई एकादश संघासाठी केल्यामुळे क्रिकेटच्या आकडेवारीत त्याच्या खात्यावर १०,१२३ धावा आहेत.
  • विंडीजविरुद्धची मालिका जिंकल्यास भारताचा हा मायदेशातील सलग सहावा एकदिवसीय मालिका विजय असेल.
  • आतापर्यंत भारताने विंडीजविरुद्ध सलग ७ एकदिवसीय मालिका जिंकल्या असून या सामन्यास सलग आठवा मालिका विजय मिळवण्यास टीम इंडिया सज्ज झाली आहे.
  • भुवेनश्वर कुमारला १०० बळींचा टप्पा गाठण्यासाठी २ फलंदाजांना बाद करण्याची आवश्यकता आहे. भुवनेश्वर कुमारने ३८.५० च्या सरासरीने ९४ सामन्यात ९८ विकेट घेतल्या आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जलद १०० विकेट घेणारा भुवनेश्वर कुमार १२ भारतीय गोलंदाज होऊ शकतो.
  • पाच धावा केल्यास विराट कोहलीच्या नावावर आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे. दिवसरात्री एकदिवसीय सामन्यात भारतीय मैदानावर चार हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी विराट कोहलीला पाच धावांची गरज आहे. विराटने ७४ एकदिवसीय सामन्यात १६ शतकासह ३९९५ धावा केल्या आहेत. पाच धावा केल्यास चार हजार धावांचा पल्ला गाठेल.
  • मायदेशात भारताने वेस्ट इंडिजबरोबर २६ एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तर २७ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने आजचा सामना जिंकल्यास भारताचा हा २७ वा विजय असेल. भारताची मायदेशात वेस्ट इंडिजबरोबरची विजयाची सरासरी ५० टक्के होईल.
  • रोहित शर्माला षटकारांचे द्विशतक करण्यास दोन षटकरांची गरज आहे. रोहित शर्माच्या नावार १९२ एकदिवसीय सामन्यात १९८ षटकार आहेत. दोन षटकार लगावल्या २०० षटकार खेचणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे. धोनीच्या नावावर 218 षटकार आहेत.
  • विराट कोहलीने विंडिजविरुद्धच्या चारही सामन्यात नाणेफेक जिंकलेली आहे. शेवटच्या सामन्यात कोहलीने नाणेफेक जिंकल्यास विंडीजविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो तिसरा कर्णधार ठरेल. याआधी दक्षिण आफ्रिकेचा हँसी क्रोन्ये आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ यांनी अशी कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरेल.
  • ग्रीनफिल्ड स्टेडियमवर आतापर्यंत एकमेव ट्वेन्टी-२० सामना २०१७मध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यात झाला होता. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ६ धावांनी पराभव केला होता. एकदिवसीय क्रिकेट सामन्याचे यजमानपद भूषवणारे हे देशातील ४७वे मैदान आहे.