ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार असल्याचे वक्तव्य न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने केले आहे. न्यूझीलंडचा संघ भारतात दाखल झाल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता. तो म्हणाला की, यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी भारतीय संघ हा नक्कीच लोकप्रिय संघ असेल, पण सर्वच विजयाच्या उद्देशानेच येथे आले आहेत. त्यामुळे स्पर्धा शंभर टक्के रंगतदार होईल. खेळपट्ट्यांची चांगली ओळख आणि संघ चांगली कामगिरी करत असल्याने भारतीय संघाला पराभूत करणे कठीण जाणार आहे. सामना जिंकून देणारे विजयवीर खेळाडू त्यांच्याकडे आहेत. ट्वेन्टी-२० साठीचा उत्तम संघ भारताने तयार केला आहे.
ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची पहिली लढत ही न्यूझीलंड सोबत १५ मार्च रोजी होणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघ पूर्ण तयारीनिशी उतरेल असा विश्वास केन विल्यमसन याने व्यक्त केला आहे. भारताविरुद्ध विजय प्राप्त करणे आमच्यासाठी दमदार सुरवात ठरेल. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम खेळ करेल, असेही तो पुढे म्हणाला.