२०१८ वर्षाअखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र हा दौरा सुरु होण्यासाठी बराच कालावधी असताना, अॅडिलेड येथे दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यावरुन दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये चांगलीच जुंपली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्ड अॅडिलेड येथे दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यासाठी उत्सुक होतं, मात्र बीसीसीआयने यासाठी आपला विरोध दर्शवला होता. अखेर बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाना अधिकृतरित्या पत्र लिहीत, दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी नकार दर्शवला आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, क्रिकेट प्रशासकीय समिती आणि बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांच्यात झालेल्या बैठकीत दिवस-रात्र कसोटी सामना न खेळण्यावर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदरलँड यांना यासंबधातला निर्णय कळवण्यात आल्याचंही समजतंय. अमिताभ चौधरी यांनी जेम्स सदरलँड यांना इ-मेल करुन बीसीसीआयचा निर्णय कळवल्याचं कळतंय.

अवश्य वाचा – अफगाणिस्तान कसोटी सामन्यासाठी अजिंक्यकडे भारतीय संघाची धुरा?

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील स्थानिक रेडीयो चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जेम्स सदरलँड यांनी, ऑस्ट्रेलिया संघ दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी आग्रही असल्याचं मान्य केलं होतं. आतापर्यंत घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ एकही दिवस-रात्र कसोटी सामना हरलेला नाहीये. भारतीय संघाला पराभवाची चिंता सतवत असल्यामुळेच दिवस-रात्र कसोटी सामन्याला नकार देत असल्याचंही सदरलँड यांनी मुलाखतीत म्हटलं होतं. त्यामुळे दोन्ही क्रिकेट बोर्डांमध्ये रंगलेल्या वादावर अखेर पडदा पडलाय असं म्हणायला हरकत नाही.