बुद्धिबळ विश्वात जगज्जेतेखालोखाल सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पियाड स्पध्रेत भारताने रविवारी रशियाच्या बरोबरीने ऐतिहासिक सहविजेतेपद पटकावले. माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद, जलद प्रकारातील विद्यमान जगज्जेती कोनेरु हम्पी अशा प्रतिभावंतांच्या अनुभवाबरोबरच, दिव्या देशमुख, प्रज्ञानंद, निहाल सरीन अशा युवा बुद्धिबळपटूंच्या असीम ऊर्जेला मिळालेली विदिथ गुजरातीच्या नेतृत्वाची साथ ही भारताच्या कामगिरीची निसंशय वैशिष्टय़े ठरली.

अंतिम लढतीत भारताचा मुकाबला बलाढय़ रशियाशी होता. पहिला सामना ३-३ असा बरोबरीत सुटल्यामुळे दुसऱ्या सामन्याला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले होते. या सामन्यात कोनेरु हम्पीचा पराभव झाला, परंतु दिव्या देशमुख जेतेपदाच्या मार्गावर होती. मात्र दिव्या देशमुख तसेच निहाल सरीनची इंटरनेट जोडणी अचानक खंडित झाली आणि वेळेवर चाली पूर्ण करता न आल्याने त्यांचा पराभव झाल्याचे जाहीर झाले. दुसऱ्या सामन्यात अशा प्रकारे भारत १.५-४.५ पराभूत झाला होता. पण भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेकडे (फिडे) याविषयी अपील केले. ते ग्राह्य़ धरले गेले आणि फिडेचे अध्यक्ष अर्कादी द्वोर्कोविच यांनी भारत व रशियाला सहविजेते घोषित केले.

भारताचे हे पहिले ऑलिम्पियाड अजिंक्यपद. या स्पध्रेत भारताने गतविजेत्या चीनवर ४-२ अशी मात केली होती. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ ठरलेल्या विदिथ गुजरातीने भारतीय संघाचे नेतृत्व समर्थपणे केले. विश्वनाथन आनंद, पेंटाल्या हरिकृष्ण असे मातब्बर संघात असूनही हा मान विदिथला मिळाला होता. यंदा कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे बुद्धिबळ ऑलिम्पियाड ऑनलाइन खेळवले गेले. त्यामुळे खुला गट व महिला गट अशी स्वतंत्र विभागणी नव्हती. त्यातही उल्लेखनीय बाब म्हणजे, युवा बुद्धिबळपटूंचाही प्रत्येक संघात समावेश करण्यात आला. भारतात अनेक युवा बुद्धिबळपटू उदयाला येत असून या बदलाचा फायदा त्यामुळे भारताला झाला.

इंटरनेटवर लाखोंची उपस्थिती

भारतीय संघाची प्रगती या स्पध्रेत जशी होत गेली, तसतसा या स्पर्धेविषयी तसेच भारतीय संघाविषयी बुद्धिबळ विश्वापलीकडेही आकर्षण निर्माण झाले होते. उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामने लाखो नेटकरींनी पाहिले. भारताच्या या बुद्धिबळरसिकांची दखल समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणात घेतली गेली.