अचूक गोलंदाजी आणि सलामीवीर मिताली राज व पूनम राऊत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय महिला संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडिजवर ९ विकेट्सनी विजय मिळवला.वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे त्यांना ११७ धावाच करता आल्या. डिनेड्रा डॉटिनने ७ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ५७ धावांची खेळी साकारली.
या माफक आव्हानाचा पाठलाग करताना मिताली आणि पूनम यांनी ११७ धावांची सलामी दिली. विजयासाठी एक धाव हवी असताना पूनम बाद झाली, तिने सात चौकारांच्या जोरावर ५६ धावांची खेळी साकारली. मितालीने ६ चौकारांच्या जोरावर नाबाद ५५ धावा केल्या.