भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक तुषार आरोठे आणि खेळाडूंमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मतभेद वाढल्याची माहिती समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातलं वृत्त दिलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार संघातील काही महिला खेळाडूंनी आरोठेंविरोधात बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचं समजत आहे. आरोठेंच्या कार्यपद्धतीमुळे आम्हाला स्वतंत्र निर्णय घेता येत नसल्याची तक्रार खेळाडूंनी केली आहे.

“काही गोष्टी हाताबाहेर केल्यामुळेच खेळाडूंनी आमच्याकडे तक्रार केली आहे. काही खेळाडूंनी केलेले आरोप गंभीर स्वरुपाचे असल्यामुळे यासंदर्भात पुढे काय करता येईल यावर सध्या विचार सुरु आहे. काही खेळाडूंनी आरोठे यांना प्रशिक्षक पदावरुन हटवण्याचीही मागणी केली आहे.” बीसीसीआयमधली सुत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच भारताचा संघ आशिया चषक टी-२० स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध पराभूत झाला होता.

बीसीसीआयमधील विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्णधार हरमनप्रीत कौर आरोठे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे. अंतिम ११ जणांचा संघ निवडण्यात हरमनप्रीतचं मत विचारात घेतलं जात नव्हतं. त्यामुळे खेळाडूंची नाराजी पाहता बीसीसीआय आणि क्रिकेट प्रशासकीय समिती आरोठेंबद्दल काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.