मालदीवचा ५-० असा धुव्वा; अध्यक्षीय लीगमध्ये राजेश, आकांक्षा यांची ऐतिहासिक कामगिरी मुंबई : मालदीवविरुद्ध झालेल्या कॅरम कसोटी मालिकेत भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवले. प्रशिक्षक अरुण केदार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने मालदीवचा ५-० असा धुव्वा उडवला. त्याशिवाय अध्यक्षीय कॅरम लीगमध्ये प्रथमच भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजेश गोहिल आणि आकांक्षा कदम यांनी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. युवा केंद्र, धालू अटोल येथे रंगलेल्या या कसोटी मालिकेतील (पाच सामन्यांची एक कसोटी याप्रमाणे) प्रत्येक सामन्यात पुरुष, महिला आणि १८ वर्षांखालील मुले-मुली यांच्यात एकेरीचे सामने खेळवण्यात आले. त्यांपैकी पहिल्या कसोटीत मुलांच्या गटात भारताच्या जी. मुकेशला पराभव पत्करावा लागला, तर दुसऱ्या कसोटीत पुरुष गटात इस्माइल आझमीनने भारताच्या इर्शाद अहमदला धूळ चारली. परंतु या दोघांव्यतिरिक्त भारताच्या अन्य खेळाडूंनी उर्वरित सर्व सामने जिंकल्यामुळे भारताने मालिकेत निर्भेळ यश संपादन केले. कसोटी मालिकेनंतर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या अध्यक्षीय लीगमध्येही भारताने मुलांच्या एकेरी गटाव्यतिरिक्त अन्य तीनही गटात विजेतेपद मिळवले. या लीगमध्ये भारताचे पाच, मालदीवचे सहा आणि श्रीलंकेचा १ असे प्रत्येक गटात १२ खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळले. पुरुष गटात महाराष्ट्राच्या राजेश गोहिलने धक्कादायक कामगिरीची नोंद करताना सर्वाधिक १० सामने जिंकून सुवर्णपदक मिळवले. विश्वविजेता प्रशांत मोरे (१० विजय), आणि श्रीलंकेचा निशांता फर्नाडो (९) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकावर नाव कोरले. साखळीतील सामन्यात राजेशने प्रशांतला नमवले होते, त्यामुळे दोघांचे समान विजय असूनही राजेशने विजेतेपदाचा किताब मिळवला. महिला गटात भारताच्या एस अपूर्वाने ११ पैकी १० लढती जिंकून सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर रश्मी कुमारीने रौप्य आणि नागज्योतीने कांस्यपदक (प्रत्येकी ९ विजय) मिळवले. मुलांच्या १८ वर्षांखालील गटात श्रीलंकेच्या सुरज मधुवंथाने सर्व ११ सामने जिंकून विजेतेपद मिळवले, तर भारताचा मुकेश आणि कामरान तन्वीर यांना अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. मुलींच्या १८ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या १३ वर्षीय आकांक्षाने सर्वाधिक १० सामने जिंकून सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. भारताच्याच शायनी सेबेस्टनने रौप्य, तर सोनाली कुमारीने कांस्यपदक मिळवले. भारताने तीन सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यपदकांसह एकूण १० पदकांची कमाई केली. भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे मी फार आनंदी आहे. मात्र पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकवून देईन, असा कधी विचारही केला नव्हता. केदार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे हे शक्य झाले. मालदीव आणि श्रीलंकेकडे फार कौशल्यवान खेळाडू आहेत, त्यामुळे भविष्यात विजेतेपद टिकवणे आव्हानात्मक असेल. - आकांक्षा कदम, भारताची कॅरमपटू ३ भारत-मालदीव यांच्यात तिसऱ्यांदा कसोटी मालिका खेळवण्यात आली. यापूर्वी २०१७मध्ये माले आणि २०१८मध्ये चेन्नई येथे ही मालिका रंगली होती. मुख्य म्हणजे भारताने तिन्ही वेळा विजेतेपद मिळवले आहे.