बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील धक्कादायक पराभवानंतर भारताचा कर्णधार महेंद्रसिंह  धोनीवर जोरदार टीका होत आहे; परंतु धोनीला ज्या पद्धतीने लक्ष्य केले जात आहे त्याबद्दल पाकिस्तानचा ट्वेन्टी-२० कर्णधार शाहिद आफ्रिदीने नापसंती व्यक्त  केली आहे.
एखादी मालिका वाईट ठरली की नावाजलेल्या क्रिकेटपटूची निंदानालस्ती करण्याची उपखंडात परंपरा आहे, असे आफ्रिदीने सांगितले. तो म्हणाला, ‘‘बांगलादेश मालिकेनंतर ज्या पद्धतीने धोनीला वागणूक दिली जात आहे, ती अतिशय वाईट आहे. एखाद्या वाईट मालिकेनंतर आपल्या नायकाची तमा बाळगली जात नाही. उपखंडातील ही पद्धत वाईट आहे. वेळोवेळी खरे चित्र न मांडणारी प्रसारमाध्यमेसुद्धा याला जबाबदार आहेत.’’
‘‘सध्याच्या कामगिरीवरून कर्णधार किंवा खेळाडूचे लगेच पृथक्करण करू नये. टीका जरूर करा, मात्र ते करण्यापूर्वी त्याचा भूतकाळ विसरू नका. धोनीबाबत भूमिका ठरवण्यापूर्वी त्याचे भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान पाहा आणि मगच अनुमान मांडा. भारताचा तो कर्तृत्ववान खेळाडू आहे. त्याची कामगिरी आणि विक्रमच सर्व काही बोलण्यास पुरेसे आहेत,’’ असे आफ्रिदीने सांगितले.