श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत भारताने लंकेला पराभवाची धूळ चारली. तसेच आजचा सामना ८ गडी राखून श्रीलंकेविरोधातली मालिकाही खिशात घातली. नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेने चांगली सुरूवात केली होती. थरंगा आणि समरविक्रमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची बागिदारी केली. पण कुलदीप यादवने थरंगाला ९५ धावांवर आणि समरविक्रमला यजुवेंद्रने ४२ धावांवर तंबूत पाठवले. ज्यानंतर श्रीलंकेचा डाव गडगडला. शिखर धवनच्या नाबाद शतकी खेळीमुळे भारताला सहज विजय मिळवता आला. ८४ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि २ षटकारांसह शिखरने त्याचे शतक पूर्ण केले. त्याची ही खेळी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली.  तसेच भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकचे फलंदाज तग धरु शकले नाहीत.

३ बाद १६० वरून श्रीलंकेचा खेळ ४४.५ षटकात सर्वबाद २१५ असा संपला. त्यानंतर भारताच्या डावात रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनीही आश्वासक सुरुवात केली. शिखर आणि रोहित शर्मा चांगली भागिदारी करून मोठा धावफलक उभारतील असे वाटले होते. मात्र धनंजयाच्या बॉलवर जोरदार षटकार ओढल्यानंतरच्या दुसऱ्याच चेंडूला रोहित शर्मा स्टंप आऊट झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी शिखर धवन आणि श्रेयस अय्यर या दोघांनी भारताचा धावफलक हलता ठेवला. या दोघांनी मिळून केलेली १३५ धावांची पार्टनरशिप महत्त्वाची ठरली.

मात्र श्रेयस अय्यर थिसारा परेराच्या चेंडूवर झेलबाद झाला. श्रेयस अय्यरने त्याच्या ६५ धावांच्या खेळीत ८ चौकार आणि एका षटकाराची आतषबाजी केली. त्याचमुळे २३ षटकांमध्ये भारताला १५० धावांची मजल मारता आली. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी दिनेश कार्तिक आणि शिखर धवन या दोघांनीही चांगली खेळी आणि भारताला सहज विजय मिळवून दिला.