करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका सर्व क्रीडा संघटनांनाही बसला आहे. सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेल्या बीसीसीआयवरही आर्थिक संकटाची टांगती तलवार आहे. यंदाचा आयपीएलचा तेरावा हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होऊ शकतं. त्यातच टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल घडू शकतो. बीसीसीआय आणि टीम इंडियाची Kit Partner असलेली कंपनी Nike यांच्यात कराराच्या नुतनीकरणावरुन सध्या रस्सीखेच सुरु आहे.

टीम इंडियाचे Kit Partner म्हणून Nike कंपनीचा बीसीसीआयसोबतचा करार सप्टेंबर महिन्यात संपणार आहे. चार वर्षांसाठी झालेल्या या कारारासाठी Nike कंपनीने बीसीसीआयला ३७० कोटी रुपये मोजले आहेत. लॉकडाउन काळात Nike कंपनीलाही मोठा फटका बसला आहे, त्यातच सामने होत नसल्यामुळे कंपनीने बीसीसीआयला करार वाढवण्याची विनंती केली आहे. मात्र बीसीसीआय हा करार वाढवण्यासाठी उत्सूक नसून सप्टेंबर महिन्यानंतर बीसीसीआय नवीन टेंडर काढण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी Economic Times शी बोलताना माहिती दिली.

Nike आणि बीसीसीआयमध्ये झालेल्या करारानुसार संघातील खेळाडूंना जर्सी, स्पोर्ट्स शूज आणि इतर साहित्य पुरवते. परंतू लॉकडाउन काळत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या तीन देशांविरुद्धच्या मालिका रद्द केल्या आहेत. ज्याचा फटका बीसीसीायसोबत स्पॉन्सर कंपन्यांनाही बसला आहे. २००६ सालापासून बीसीसीआय आणि Nike कंपनीमध्ये करार झालेला आहे. त्यावेळपासून टीम इंडिया आणि Nike चं नात आहे. परंतू यंदा हा करार न झाल्यास टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल होऊ शकतो.