मुंबई, एक असं शहर जिथे स्थायिक होण्याचा अनेकांचाच मनसुबा असतो. विविध क्षेत्रातील दिग्गजांनीही ही अशी स्वप्न पाहिली होती, किंबहुना याच स्वप्नांच्या बळावर अनेकांना सतत पुढे जात आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली. सहसा या शहरामध्ये राहणं अनेकांच्या खिशाला परवडण्यापलीकडे आहे असं म्हटलं जातं. घरासाठीची जागा, दिवसेंदिवस घरभाड्यांच्या दरात होणारी वाढ ही त्यामागची काही कारणं. पण, या साऱ्या कारणांचा क्रिकेटपटू विराट कोहलीवर काहीच परिणाम होताना दिसत नाहीये. हे असं म्हणण्याचं कारण की, सध्याच्या घडीला विराट मुंबईतील ज्या घरी राहतोय, ते त्याचं भाड्याचं घर असून, तो तब्बल १५ लाख रुपये इतकं भाडं देऊन या मायानगरीत राहत आहे.

‘नवभारत टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सध्याच्या घडीला विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा वरळी येथील ज्या इमारतीत राहतात त्या इमारतीतील त्यांच्या घराचं भाडं प्रतिमहिना १५ लाख रुपये आहे. हा आकडा ऐकून सध्याच्या घडीला अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

वाचा : VIDEO : तरुणाईला वेड लावणाऱ्या प्रियाचं ‘ते’ भुवई उंचावणं चोरीचं?

दरम्यान, २०१६ मध्ये विराट आणि अनुष्काने वरळी येथील एका उच्चभ्रू परिसरात ३४ कोटींचे एक आलिशान घर खरेदी केले होते. ते घर अजूनही निर्माणाधीन असल्यामुळेच ‘विरुष्का’ सध्या एका दुसऱ्या घरात राहात आहेत. २०१९ मध्ये विराटला त्याच्या नव्या घराचा ताबा मिळणार आहे. त्यामुळे तुर्तास त्या दोघांनीही २४ महिन्यांचा करार करत वरळीतच एक घर भाड्याने घेतलं आहे.