एशियन गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय पुरुष फुटबॉल संघ पात्र ठरला आहे. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने फुटबॉल संघाला हिरवा कंदिल दाखवला आहे. यासोबतच हॅण्डबॉल संघही पात्र ठरला आहे. फुटबॉल आणि हॅण्डबॉल दोन्ही संघ अत्यंत चांगली प्रगती करत असून त्यांना संधी मिळाली पाहिजे असं इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव राजीव मेहता यांनी सांगितलं आहे.

‘फुटबॉल संघ प्रगती करत आहे. फुटबॉल संघ सध्या १६ व्या क्रमांकावर असून चांगली कामगिरी करत तो १० व्या क्रमांकावर पोहोचेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुरुष संघाला पात्र ठरवण्यात आलं आहे’, असंही ते म्हणाले आहेत. हॅण्डबॉल संघाबाबात बोलताना, ते सध्या १२ व्या क्रमांकावर असून अजून चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं.

जिम्नॅस्टिक संघाची निवड करण्यासाठी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने पाच सदस्यीय निवड समिती गठीत केली आहे. याशिवाय घोडेस्वारी संघाला न पाठण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडीवरुन झालेल्या वादानंतर हा निर्णय घेण्यात आला.

जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडियाने निवड समितीची पाच नावांची शिफारस केली असून इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने ती मान्य केली आहेत. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्ष सुनैना कुमारी या समितीचं नेतृत्व करतील. याशिवाय समितीत सुरेश शर्मा, रजिंदर पठाणीया, मकरंद जोशी आणि राम मिलन यांचा समावेश आहे.

संघ निवडीसाठी जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडियाने २४ जूनला पुण्यात निवड चाचणी घेण्याचं ठरवलं होतं. पण इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने त्याच तारखेला दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडिेअमवर चाचणी घेण्यास सांगितलं आहे.

राजीव मेहता यांनी क्रिडा सचिवांनी गेल्या बैठकीत एशियन गेम्ससाठी एका चांगल्या संघाची निवड करण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यास सांगितलं होतं अशी माहिती दिली आहे. ‘आम्हाला क्रिडा मंत्रालयाकडून कोणतंही पत्र मिळालेलं नाही. मात्र गेल्या बैठकीत क्रिडा सचिवांनी योग्य तो निर्णय घेण्याची सूचना केली होती’, असं मेहता यांनी म्हटलं आहे.