नवी दिल्ली : येत्या शनिवारपासून मलेशियात सुरू होत असलेल्या अझलन शाह चषक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारताचा पहिला सामना जपानविरुद्ध २३ मार्च रोजी होणार आहे. नुकताच भारतीय संघ या स्पर्धेत भाग घेण्यासाठी बेंगळुरू येथून रवाना झाला. स्पर्धेसाठी भारतीय संघाचे सराव शिबिर बेंगळुरू येथे घेण्यात आले होते. या शिबिरात भारतीय संघाने स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली असल्याचे कर्णधार मनप्रीत सिंगने सांगितले. या स्पर्धेत एकापेक्षाएक सरस संघ सहभागी होत असल्यामुळे कुठल्याच संघाला आपण कमी लेखण्याची चूक करणार नसल्याचे मनप्रीतने स्पष्ट केले. प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा असून तो जिंकण्यासाठीच आमचा प्रय असेल, असेही त्याने सांगितले. स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचे आमचे पहिले लक्ष्य आहे. मलेशियात उष्ण आणि दमट हवामानात या स्पर्धेत आम्हाला खेळावे लागणार आहे. मग त्या दृष्टीनेच आम्ही बेंगळुरूमध्ये जोरदार सराव केला. संघात युवा खेळाडूंचा भरणा असून त्यांच्या कामगिरीवर आपले लक्ष असेल. या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली तर ही स्पर्धा जिंकण्यास आम्हाला जड जाणार नसल्याचेही मनप्रीतने सांगितले. युवा खेळाडूंना या स्पर्धेत शिकण्याची चांगली संधी मिळणार आहे. त्याचा त्यांनी जरूर फायदा घ्यावा, असेही मनप्रीत म्हणाला. भारताचा दुसरा सामना २४ मार्चला दक्षिण कोरियाशी होणार आहे. तर २६ मार्चला यजमान मलेशियाशी भारताला खेळायचे आहे. सलामीच्या लढतीत भारताची खरी कसोटी लागणार असून आशियाई विजेत्या जपानशी भारताला लढत द्ययची आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघाचे मानांकन इतर संघांपेक्षा खूप वरचे आहे. त्यामुळे भारताला चांगला खेळ करावा लागणार. या स्पर्धेत चांगली सुरुवात करून भुवनेश्व्र येथे होणाऱ्या एफआयएच सिरीज फायनल स्पर्धेचीे आम्ही जय्यत तयारी करणार असल्याचे मनप्रीतने सांगितले.