भारतीय संघ २१ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताकडून रोहित शर्माचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या फलंदाजीची ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याला धडकी भरली असून रोहितचा झंझावात थांबवणं अशक्य आहे, असे मत मॅक्सवेलने व्यक्त केले आहे. या दरम्यान, रोहितने ऑस्ट्रेलियात विजयाची छाप सोडायची असल्याचे वक्त्यव्य केले आहे.

ऑस्ट्रेलिया हे असे ठिकाण आहे, जेथे आम्हाला आमच्या विजयाची छाप सोडायची आहे आणि सर्वोत्तम सांघिक कामगिरी करायची आहे. गेल्या वेळी आम्ही येथे जेव्हा कसोटी मालिका खेळलो होतो तेव्हा आम्ही २ सामने पराभूत झालो आणि १ सामना अनिर्णित राखण्यात आम्हाला यश आले. पण त्यातही काही सामने हे अत्यन्त अटीतटीचे झाले.

ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाचा संघ कायमच घातक असतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी आम्हाला संपूर्ण संघ एकत्र येऊन प्रयत्न होणे गरजेचे आहे. हाच आमचा उद्देश आहे. या दौऱ्यात एक-दोन खेळाडूंनी चांगली कामगिरी करणे पुरेसे ठरणार नाही. पूर्ण संघाने एकत्रितपणे आव्हानाचा सामना करण्याचा आणि सामना जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही तो म्हणाला.