Asia Cup 2018 : भारताने सलामीच्या लढतीत हाँगकाँगवर २६ धावांनी रडतखडत विजय मिळवला. सलामीवीर निझाकत खान (९२) आणि कर्णधार अंशुमन रथ (७३) यांनी १७४ धावांची सलामी भागीदारी करून भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. पण हे दोघे बाद झाल्यानंतर हाँगकाँगच्या डावाला उतरती कळा लागली आणि भारताने सामना जिंकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खलील अहमदने आणि युझवेन्द्र चहलने सर्वाधिक प्रत्येकी ३-३ बळी टिपले. तत्पूर्वी, भारताने ५० षटकात ७ बाद २८५ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून शिखर धवन याने गब्बर खेळी करत शतक ठोकले. त्याने १२० चेंडूत १२७ धावा केल्या. या खेळीत त्याने १५ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली. मात्र शिखर धवनला शतक ठोकण्यासाठी तब्बल सात महिने वाट पाहावी लागली. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेत भारताचा ४-१ असा दारुण पराभव झाला. या मालिकेत भारताच्या पराभवाचे महत्वाचे कारण म्हणजे सलामीवीरांचे अपयश. या मालिकेत सलामीवीर शिखर धवन हा सातत्याने अपयशी ठरला. अपयशी ठरलेल्या भारताचा सलामीवीर शिखर धवनने आशिया चषक स्पर्धेत सकारात्मक सुरूवात केली. दुबळ्या हाँगकाँगविरुद्ध त्याने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. पण, या शतकासाठी त्याला सात महिन्यांचा कालावधी लागला. त्याने १० फेब्रुवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०९ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने प्रथमच पन्नास धावांचा टप्पा ओलांडला.