भारतीय संघातील सर्व खेळाडू रांची येथे ऑस्ट्रियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्याचे मानधन पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना मदतनिधी म्हणून देणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यानंतर बोलताना ही माहिती दिली. रांची येथे ऑस्ट्रियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यामधील पुलवामा हल्लानंतर शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना ‘आर्मी कॅप’ घालून आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली आहे. सामना सुरु होण्याआधी भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने या कॅप्सचे खेळाडूंना वाटप केले. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

नाणेफेकीसाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट ‘आर्मी कॅप’ घालून आला. विराटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर समालोचक मुरली कार्तीकने कोहलीला या ‘आर्मी कॅप’बद्दल विचारले असता या कॅपच्या माध्यमातून आम्ही पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवनांना श्रद्धांजली अर्पण करणार असल्याचे सांगितले. ‘संघातील सर्व खेळाडूंनी या सामन्याचे सर्व मानधन राष्ट्रीय सुरक्षा मदतनिधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.’ असं विराटने यावेळी बोलताना सांगितले. तसेच सर्वांनीच राष्ट्रीय सुरक्षा मदतनिधीसाठी योगदान द्यावे असं आवाहन विराटने भारतीयांना केले. ‘भारतीय संघाचा कर्णधार म्हणून मी सर्व भारतीयांना अशी विनंती करेल की त्यांनी शक्य असेल तितकी मदत राष्ट्रीय सुरक्षा मदतनिधीसाठी करावी. शहिदांच्या कुटुंबियांसाठी तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शक्य तितकी मदत आपण सर्वांनी करायला हवी,’ असं विराटने यावेळी बोलताना सांगितले.

बीसीसीआयने केलेल्या ट्विटमधील व्हिडीओ कॅप्शनमध्ये, ‘पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने आज भारतीय खेळाडू ‘आर्मी कॅप’ घालून मैदानात उतरणार आहेत.

#INDvsAUS: भारतीय संघाची पुलवामा शहिदांना श्रद्धांजली, ‘आर्मी कॅप्स’ घालून मैदानात

भारतीयांनी शहीद जवनांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि नातेवाईकांसाठीच्या मदतनिधीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात देणगी द्यावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला आहे’ असं म्हटलं आहे. या ट्विटच्या शेवटी बीसीसीआयने #JaiHind हा हॅशटॅगही वापरला आहे.

धोनीने खेळाडूंबरोबरच सहाय्यक स्टाफलाही हा कॅप्सचे वाटप केले. केदार जाधवने ही कॅप घेताना लष्करातील जवानांप्रमाणे कडकडीत सॅल्यूट केला. या आधी २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी २० सामन्यात भारतीय खेळाडूंनी काळ्या फिती बांधून व मैदानावर मौन पळून शहिदांना श्रद्धांजली वाहिली होती.

आज बीसीसीआयने ‘आर्मी कॅप्स’च्या माध्यमातून शहिदांना श्रद्धांजली वाहण्याबरोबरच भारतीयांनी शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करणाऱ्या मदतनिधीसाठीमध्ये आपले योगदान द्यावे हा संदेश दिला आहे. या खास ‘आर्मी कॅप्स’वर तयार केलेल्या या टोप्यांवर बीसीसीआयचा लोगो आहे. सर्वांना कॅप वाटप केल्यानंतर कोहलीने धोनीला कॅप दिली.

विराटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच समान्यांच्या मालिकेमध्ये भारताने २-० अशी आघाडी मिळवली असून मालिकेमधील आव्हान टिकून ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हा समाना जिंकावाच लागेल. तर दुसरीकडे भारतीय संघ हा सामना जिंकून मालिका विजयाच्या उद्देशानेच मैदानात उतरेल.