ऑस्ट्रेलियाने चौरंगी राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारतावर २-१ असा विजय मिळवला.
या सामन्याची भारताने दमदार सुरुवात केली होती. भारताचा बचाव सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये एवढा भक्कम होता की, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना गोल करण्याची संधी मिळत नव्हती. पण सामन्याच्या नवव्या मिनिटाला यजमान ऑस्ट्रेलियाच्या ग्रेस स्टुअर्टने गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पण त्यानंतर तीन मिनिटांमध्येच भारताने या गोलची परतफेड केली. ऑस्ट्रेलियाच्या बचावपटूंकडून झालेली चूक भारताच्या पथ्यावर पडली. या गोलनंतर भारताचे मनोबल कमालीचे उंचावले होते. पण मध्यंतरापर्यंत सामन्यात १-१ अशी बरोबरी कायम होती.
दुसऱ्या सत्रामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ अधिक आक्रमक झालेला पाहायला मिळाला. अखेरच्या काही सत्रांमध्ये भारताला पेनल्टी कॉर्नर्स मिळाले होते. या वेळी दीपिकाला गोल करण्याची चांगली संधी होती, पण ऑस्ट्रेलियाच्या चांगल्या बचावामुळे भारताची ही संधी हुकली. पण एमिली स्मिथच्या गोलच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.