अनिर्णित झालेल्या कसोटीचा थरार किती रोमांचकारी असू शकतो याचा प्रत्यय जोहान्सबर्ग कसोटीने दिला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेसमोर भारतीय संघाने ४५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र हे लक्ष्य पार करण्याची जिद्द आफ्रिकेच्या फलंदाजांनी दाखवली. अंधुक प्रकाशात विजयासाठी आवश्यक १६ धावांसाठी भारतीय गोलंदाजीवर आक्रमण करण्याच्या नादात पराभव पदरी पडण्याची भीती असलेल्या दक्षिण आफ्रिकेने तीन षटके खेळून काढत सामना अनिर्णित राखला. या सामन्यातील आठवणीत राहण्यासारखे महत्वाचे पाच क्षण..

१. भारताचा गतीमान गोलंदाज झहीर खानने याही सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथची विकेट काढली; आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये झहीरने ग्रॅमी स्मिथला आतापर्यंत १४ वेळा बाद केले आहे
२. अनुभवी गोलंदाज झहीर खानने जॅक कॅलिसला पायचीत करत कसोटीतील ३००व्या बळीची नोंद केली. ८९व्या कसोटीत झहीरने ही किमया साधली. कसोटी क्रिकेटमध्ये ३०० बळी टिपणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. कपिल देव, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी याआधी ३०० विकेट्चा जादुई आकडा गाठला आहे.
३. तर दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने फिलँडरने आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये १०० विकेट्सचा टप्पा गाठला. फिलँडर दक्षिण आफ्रिकेचा सर्वात जलद १०० विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.
४. सामन्याच्या दोन्ही डावात भारतीय फिरकीपटूंना एकही विकेट मिळविता आली नाही.
५. शेवटच्या क्षणी आफ्रिकेला जिंकण्यासाठी १९ चेंडूत केवळ १६ धावांची गरज होती. कसोटी सामन्याला टी-२०चे स्वरूप प्राप्त झाले होते. परंतु, फिलँडर आणि स्टेन यांनी बचावात्मक धोरण स्वीकारले आणि एक ऐतिहासिक कसोटी अनिर्णित निर्णयासह क्रिकेटच्या इतिहासात नोंदली गेली.