भारतीय महिला संघाने विंडीजच्या संघाचा तिसऱ्या टी २० सामन्यात सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या विंडीजच्या संघाचा भारतीय गोलंदाजांनी ५९ धावांत खुर्दा उडवला. ६० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताने ७ गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत ३-० ची विजयी आघाडी घेतली.

नाणेफेक जिंकून विंडीजच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांच्या कर्णधाराचा निर्णय अत्यंत चुकीचा ठरला. विंडीजच्या ८ फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. विंडीजकडून छीडन नेशन आणि सीनल हेन्री या दोघींनी सर्वाधिक ११ धावा केल्या. भारताच्या राधा यादव व दिप्ती शर्माने प्रत्येकी २ तर अनुजा पाटील, पूजा वस्रकार, हरमनप्रीत कौर आणि पूनम यादव या चौघींनी १-१ बळी टिपला.

६० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली होती. सलामीवीर शफाली वर्मा शून्यावर बाद झाली. स्मृती मंधानाही पाठोपाठ ३ धावांवर बाद झाली. हरमनप्रीत कौरही ७ धावांवर माघारी परतली. पण जेमायमा रॉड्रीग्जने नाबाद ४० धावांची खेळी करत भारताला सामना जिंकवून दिली.