चीननंतर अनेक देशांमध्ये पसरलेल्या करोना विषाणू संसर्गामुळे जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्यानंतर आता इंडियन प्रीमियर क्रिकेट लीगला (आयपीएल) त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. करोनापासून सावधगिरी बाळगण्यासाठी सरकारनं गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचंही आवाहन सर्वांना केलं आहे. करोनामुळे आयपीएस स्पर्धा पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

२९ मार्चपासून आयपीएएलच्या तेराव्या हंगामाला सुरूवात होणार आहे. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यावर विचार सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. “अनेक मोठे कार्यक्रम रद्द होत आहेत. गर्दीच्या ठिकाणी अशा आजारांचा प्रसार होण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा नंतर घेतली तरी चालू शकते. खबरदारीचा उपाय म्हणून आयपीएस स्पर्धा पुढे ढकलण्याचा विचार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

करोनामुळे जगभरात ३५०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले असून भारतातील करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच ही स्पर्धा घेण्याचे संयोजकांनी ठरवले आहे. अशात आता ही स्पर्धा पुढे ढकलण्यावर विचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या एकाही परदेशी खेळाडूने भारतात प्रवास करण्याविषयी आक्षेप घेतलेला नाही. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमधील जवळपास ६० खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार असून या देशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.