भारताचा आघाडीचा फिरकीपटू रविचंद्रन आश्विन आयपीएलच्या अकराव्या हंगामाच्या लिलावानंतर अजुनही नाराज आहे. वास्तविक पाहता आश्विनवर अकराव्या हंगामात ७ कोटी ७० लाखांची बोली लावण्यात आली होती, मात्र गेली अनेक वर्ष चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणाऱ्या आश्विनला यंदा किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या ताफ्यात भरती करुन घेतलं आहे. “जवळपास ८ वर्षांपेक्षा जास्त काळ मी चेन्नईचं प्रतिनिधीत्व केलं आहे, त्यामुळे लिलावात मला चेन्नईने डावललं या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं.” रविचंद्रन आश्विनने आपल्या मनातली खंत बोलून दाखवली.

अवश्य वाचा – आयपीएलच्या लिलावाचा आठवडा माझ्यासाठी कसोटीचा काळ ठरला – राहुल द्रविड

२००८-२०१५ या कालावधीत रविचंद्रन चेन्नई सुपरकिंग्जचा महत्वाचा हिस्सा होता. मात्र २०१६ आणि १७ च्या हंगामात स्पॉट फिक्सींग प्रकरणात बंदीची शिक्षा भोगावी लागल्यामुळे रविचंद्रन आश्विन पुणे सुपरजाएंट्स संघाकडून खेळला. मात्र अकराव्या हंगामासाठी चेन्नईचा संघ रविचंद्रन आश्विनला संघात कायम राखेल असा अंदाज वर्तवला जात असताना, प्रत्यक्ष लिलावाच्या दरम्यान चेन्नईने आश्विनला विकत घेण्यात स्वारस्य दाखवलं नाही. अखेर किंग्ज इलेव्हन पंजाबने यात बाजी मारत आश्विनवर ७ कोटी ६० लाखांची बोली लावली.

“चेपॉकच्या मैदानावर गोलंदाजी करण्यासाठी आल्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद, टाळ्या-शिट्ट्या या सर्व गोष्टी मला आता अनुभवायला मिळणार नाही. अजुनही या गोष्टींची मला आठवण येते. मात्र यंदा पंजाबकडून खेळताना जेव्हा चेन्नईविरुद्ध मी चेपॉकच्या मैदानात उतरेन तेव्हा मी त्याच इर्ष्येने पुन्हा मैदानात उतरेन.” आयपीएलच्या अकराव्या हंगामाबाद्दल बोलताना रविचंद्रन आश्विनने आपल्या भावना व्यक्त केल्या.

अवश्य वाचा – BLOG: आशा-निराशेच्या चौकोनात भारतीय क्रिकेट!!