आयपीएलमध्ये प्रत्येक फलंदाज ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतो. ही कॅप त्या फलंदाजाला दिली जाते ज्याने सीरिजमध्ये सर्वाधिक धावा केलेल्या असतात. सध्या ही कॅप भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला देण्यात आली होती. पण बंगळुरूच्या या कर्णधाराने ती कॅप घेण्यास स्पष्ट नकार दिला. मंगळवारी बंगळुरू आणि मुंबईमध्ये सामना खेळण्यात आला. या सामन्यात विराटने ९२ धावांची खेळी केली. सामना झाल्यानंतर त्याला ऑरेंज कॅप देण्यात आली. पण विराटने ती कॅप घेण्यास स्पष्ट नकार दिला.

ऑरेंज कॅप मिळाल्यानंतरही कोहलीच्या चेहऱ्यावर फारसा आनंद दिसून आला नव्हता. याचं कारण सांगताना कोहली म्हणाला की, या सामन्यात त्याच्या संघाने अपेक्षित कामगिरी न केल्यामुळे तो नाराज झाला होता. विराटने ६२ चेंडूंमध्ये ९२ धावा केल्या. पण त्याची ही कामगिरी संघाला विजय मात्र देऊ शकली नाही. म्हणूनच कोहलीने हरलेल्या दिवशी ऑरेंज कॅप घेण्यास नकार दिला. विराटने आतापर्यंत आयपीएलमध्ये ४६१९ धावा केल्या आहेत. त्याच्या मागोमाग दुसऱ्या स्थानी सुरेश रैना आहे. सुरेशने ४५५८ धावा केल्या आहेत.

ऑरेंज कॅपला नकार देताना विराट म्हणाला की, ‘मुंबई इंडियन्ससाठी आजचा सामना फार चांगला होता. पण ही ऑरेंज कॅप घेण्याचं माझं मन होत नाही. ही टोपी घालावी असंही आता मला वाटत नाही. आम्हाला सामना जिंकण्याची खूप चांगली संधी मिळाली होती. पण आम्ही आमच्या हातूनच सामना गमावला. ज्यापद्धतीने फलंदाज बाद होत होते. त्यामुळे सामना आमच्या हातून गेला.’