आयपीएलच्या बाराव्या हंगामात आंद्रे रसेल आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांची मन जिंकून घेतो आहे. बंगळुरुविरुद्ध झालेल्या सामन्यातही रसेलने आपल्या याच फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला अशक्यप्राय वाटणारं आव्हान अगदी सहजरित्या पूर्ण करुन दिलं. बंगळुरुने दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रसेलने 13 चेंडूत 1 चौकार आणि 7 षटकारांच्या सहाय्याने 48 धावा केल्या. आतापर्यंतच्या सामन्यात रसेलचे हेच षटकार प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं समोर आलं आहे.

आतापर्यंतच्या सामन्यात रसेलने 22 षटकार ठोकले आहेत. यापैठी हैदराबाद आणि बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात रसेलच्या खेळीमुळे कोलकात्याने सामन्यात बाजी मारली आहे. दिल्लीविरुद्धचा सामना कोलकाता बरोबरीत राखण्यात यशस्वी झाली मात्र सुपरओव्हरमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

रसेलच्या याच आक्रमक फलंदाजीमुळे आयपीएलमध्ये अखेरच्या 3 षटकात धावसंख्या गाठण्याचं गणितच पालटलं आहे.

दरम्यान, सलग चार पराभव पदरी पडल्यानंतर बंगळुरुच्या संघाने कोलकात्याविरुद्ध सामन्यात आपल्या कामगिरीमध्ये चांगली सुधारणा केली. नवदीप सैनीने सुनिल नरिनला बाद करत कोलकात्याला पहिला धक्का दिला. यानंतर ख्रिल लिन, रॉबिन उथप्पा जोडीने पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला. या दोन्ही कोलकात्याच्या डावाला आकार दिला. मात्र रॉबिन उथप्पा माघारी परतल्यानंतर कोलकात्याचा एक-एक फलंदाज हजेरी लावून माघारी परतले. मात्र अखेरच्या षटकात आंद्रे रसेल आणि शुभमन गिल जोडीने फटकेबाजी करत कोलकात्याला विजय मिळवून दिला. बंगळुरुकडून पवन नेगी आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी 2-2 तर युझवेंद्र चहलने 1 बळी घेतला.