दिल्लीच्या फिरोजशहा मैदानावर दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्यात, सुपरओव्हरमध्ये दिल्लीने बाजी मारली. विजयासाठी दिलेलं 11 धावांचं आव्हान पूर्ण करणं कोलकात्याला जमलं नाही. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना फिक्स होता का?? अशी शंका सध्या सोशल मीडियावर नेटीझन्सकडून व्यक्त केली जात आहे. दिल्लीच्या गोलंदाजीदरम्यान, यष्टीरक्षक ऋषभ पंतने व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरल्यामुळे आयपीएलवर फिक्सींगचं सावट असल्याची चर्चाही नेटीझन्समध्ये रंगत आहे. या सर्व प्रकारावार बीसीसीआयने स्पष्टीकरण देत फिक्सींगची शक्यता फेटाळून लावली आहे.

कोलकात्याची फलंदाजी सुरु असताना, दिल्लीचा संदीप लामिच्छाने चौथं षटक टाकत होता. यावेळी ऋषभ पंतने यष्टींमागून क्षेत्ररक्षणातल बदल करत असताना, “ये तो वैसे भी चौका हे” (यापुढचा चेंडू तर चौकारच जातोय) असं वक्तव्य केलं. स्टम्पजवळ लावलेल्या माईकमध्ये पंतचं हे वक्तव्य रेकॉर्ड झालंय.

अवश्य वाचा – Video : ऋषभ पंतचा हा भन्नाट झेल पाहिलात का??

“मात्र, त्या वाक्याआधी ऋषभ पंत नेमकं काय बोललाय हे कोणीही ऐकलं नाहीये. कदाचीत तो कर्णधार श्रेयस अय्यरला ऑफ साईडला चौकार थांबवण्यासाठी क्षेत्ररक्षक वाढवण्यासाठीही सांगत असेल.” बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना स्पष्टीकरण दिलं आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : एका धावाने पृथ्वीचं शतक हुकलं आणि विक्रमाची सुवर्णसंधीही

याचसोबत ऋषभ पंतने ते वाक्य नेमक्या कोणत्या अनुषंगाने म्हटलं हे देखील व्हिडीओमधून स्पष्ट होत नाहीये. नेमकं काय घडलंय हे जाणून न घेता एखाद्या तरुण खेळाडूची कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे. एखाद्या व्हिडीओची सत्यता न पडताळता काही प्रसारमाध्यमांनी याला फिक्सींगचं स्वरुप देऊन बातम्या केल्या आहेत. हा प्रकार योग्य नसल्याचंही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

अवश्य वाचा – IPL 2019 : दिग्गज खेळाडूंना मागे टाकत आंद्रे रसेलची ऐतिहासिक कामगिरी

दरम्यान आयपीएलच्या सामन्यांचं डिजीटल प्रक्षेपण करणाऱ्या ‘हॉटस्टार’ या वाहिनीने आपल्या Video Footage चा गैरवापर होत असल्याबद्दलची तक्रार विविध सोशल मीडियाला दिलेल्या आहेत. यावर कारवाई करत ट्विटरने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन ऋषभ पंतचे बहुतांश व्हिडीओ हटवले आहेत.