IPL 2019 DC vs KXIP Updates : शिखर धवन (५६) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (५८*) यांच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्लीने पंजाबच्या संघाला ५ गडी राखून पराभूत केले. सलामीवीर ख्रिस गेलने केलेल्या आक्रमक अर्धशतकी (६९) खेळाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने १६३ धावांपर्यंत मजल मारली होती आणि दिल्लीला १६४ धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना सामना अटीतटीचा झाला, पण अखेर २ चेंडू शिल्लक ठेवून दिल्लीने पंजाबला धूळ चारली. १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर पृथ्वी शॉ धावबाद झाला. ११ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार लगावत त्याने १३ धावा केल्या. शॉ बाद झाल्यावर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर या दोघांनी दिल्लीचा डाव सावरला आणि भक्कम भागीदारी केली. दिल्लीच्या संघातून खेळताना शिखर धवनने आपला अनुभव दाखवून देत हंगामातील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याबरोबरच दिल्लीनेही शतकी मजल मारली. अर्धशतकी खेळी केल्यानंतर शिखर धवन हवेत उंच फटका मारून झेलबाद झाला. त्याने ४१ चेंडूत ५६ धावा केल्या. त्यात ७ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. ऋषभ पंतने अतिशय खराब फटका खेळत तंबूचा रस्ता धरला. त्याने केवळ ७ धावा केल्या. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने अत्यंत महत्वपूर्ण खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि एक बाजू लावून धरली. फटकेबाजी करणारा कॉलिन इन्ग्राम मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला आणि सामन्यात रंगत वाढली. त्याने ४ चौकारांसह ९ चेंडूत १९ धावा केल्या. निर्णायक क्षणी दुहेरी धाव घेण्याचा अक्षर पटेल याचा प्रयत्न फसला. मोहम्मद शमी आणि अक्षर पटेल यांच्यात टक्कर होता होता राहिली, पण त्यामुळे पटेल नाट्यमय पद्धतीने धावबाद झाला आणि नाराज होऊन तंबूत परतला. अखेर श्रेयस अय्यरने चौकार लगावत दिल्लीला सामना जिंकवून दिला. अय्यरने नाबाद ५८ धावा केल्या. पहिल्यांदा फलंदाजीची संधी मिळालेल्या पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, डेव्हिड मिलर हे फलंदाज झटपट माघारी परतले. यानंतर ख्रिस गेलने मनदीप सिंहच्या साथीने भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. यादरम्यान ख्रिस गेलने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. सलामीवीर ख्रिस गेलने केलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने १६३ धावांपर्यंत मजल मारता आली. ख्रिस गेलने ३७ चेंडूत ६९ धावा केल्या. त्याच्या खेळीत ६ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. ही जोडी फुटल्यानंतर पंजाबचा संघ पुन्हा एकदा कोलमडला. यानंतर हरप्रीत ब्रार आणि रविचंद्रन आश्विन यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. पंजाबकडून संदीप लामिच्छानेने ३, अक्षर पटेल आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी २-२ बळी घेतले.