गतविजेच्या चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या बाराव्या हंगामाची सुरुवात मोठ्या धडाक्यात केली. पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं आव्हान पूर्ण करत चेन्नईने 7 गडी राखून विजय मिळवला. मात्र या विजयानंतरही चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी चिंतेत आहे. चेन्नईच्या खेळपट्टीवर धोनी समाधानी नसल्याचं कळतंय. चेन्नईची खेळपट्टी सुधारण्यास अजुन वाव असल्याचं धोनी म्हणालाय.

बंगळुरुने दिलेलं 71 धावांचं आव्हान पूर्ण करताना चेन्नईला 15 पेक्षा जास्त षटकं लागली. “खेळपट्टी एवढी संथ असेल याचा मी विचारही केला नव्हता. आयपीएलमध्ये पुनरागमनानंतर आम्ही इकडे काही सामने खेळलो. मात्र पहिल्या सामन्यात खेळपट्टीशी जुळवून घेताना जरा कठीण जात होतं. जर आगामी काळात खेळपट्टी अशीच राहिली, तर आम्हालाही ते धोकादायक ठरु शकेल. सध्याच्या परिस्थितीत असलेल्या खेळपट्टीपेक्षा अधिक चांगली खेळपट्टी आम्हाला अपेक्षित आहे.” धोनीने खेळपट्टीबद्दल आपली नाराजी व्यक्त केली.

“पहिल्या सामन्याआधी याच खेळपट्टीवर आम्ही काही सराव सामने खेळलो होतो. मात्र त्यावेळी चेंडू इतका वळत नव्हता. पहिल्या सामन्यात मात्र चेंडू चांगलाच वळत होता. धोनी खेळपट्टीविषयी बोलत होता. पहिल्या सामन्याच चेन्नईच्या फिरकीपटूंसमोर बंगळुरुची फलंदाजी पुरती कोलमडली. पार्थिव पटेलचा अपवाद वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.

अवश्य वाचा – IPL 2019 : रैनाचा पराक्रम, 5 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला फलंदाज