IPL 2019 Final MI vs CSK : शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईच्या संघाने चेन्नईला एका धावेने पराभूत केले आणि IPL विजेतेपदाचा चौकार लगावला. मुंबईने दिलेले १५० धावांचे आव्हान चेन्नईला पार करता आले नाही. शेवटच्या चेंडूवर २ धावा हव्या असताना अनुभवी लसिथ मलिंगाने शार्दूल ठाकूरला पायचीत केले. या चेंडूमुळे मुंबईला विजेतेपद मिळाले. अटीतटीच्या या लढतीत राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांची गोलंदाजीही अत्यंत निर्णायक ठरली.

लसिथ मलिंगा हा अनुभवी गोलंदाज असला, तरी त्याने पहिल्या ३ षटकात तब्बल ४२ धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे अंतिम षटक त्याला द्यावे का याबाबत यक्ष प्रश्न होता. पण कर्णधार रोहित शर्माने निःशंकपणे त्याला अंतिम षटक टाकायला बोलवले. सामन्यानंतर बोलताना रोहितने या निर्णयाबाबत खुलासा केला. रोहित म्हणाला की मलिंगा हा चॅम्पियन खेळाडू आहे. संघाला सामना जिंकवून देणे ही चॅम्पियन खेळाडूची ओळख असते. त्याने तिसरे षटक अतिशय महागडे टाकले होते. पण त्याला त्याच्यावर विश्वास होता की तो सामना जिंकवून देईल.

२० व्या षटकासाठी हार्दिक पांड्याचेही नाव विचारात होते, पण दडपणाच्या परिस्थितीत गोलंदाजी करण्याचा अनुभव असलेल्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यावी असे मला वाटले. मलिंगाने अशा पद्धतीच्या परिस्तितीमध्ये अनेकद गोलंदाजी केली आहे. म्हणून मी त्याला शेवटचे षटक टाकण्यास बोलावले, असे रोहितने सांगितले.

Video : झिरो टू हिरो… असा रंगला मलिंगाचा अंतिम सामन्यातील प्रवास

”कर्णधार म्हणून मी प्रत्येक सामना आणि प्रत्येक स्पर्धा समजून घेण्याचा आणि शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. पण या स्पर्धेच्या विजेतेपदाचे श्रेय हे संपूर्ण संघाला द्यायला हवे. कर्णधार हा संघातील खेळाडूंचे प्रतनिधीत्व करत असतो असा माझा ठाम विश्वास आहे आणि खेळाडूच चांगला कर्णधार घडवतात, असा मला विश्वास आहे, अशी रोहित म्हणाला.

”आम्ही चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळलो. आम्ही गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आलो हे खूप चांगले झाले. स्पर्धेच्या सुरुवातीला आम्हाला स्पर्धेचे २ विभाग करायचे होते. पण केवळ मैदानवरील ११ खेळाडूच नव्हे, तर इतर खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि इतर सर्व सहायक यांचाही हा विजय आहे. स्पर्धेत आमची गोलंदाजी उत्कृष्ट झाली. अनेक सामने आम्हाला गोलंदाजानी जिंकवून दिले आणि म्हणूनच आम्ही स्पर्धेचे विजेतेपद पटकावू शकलो.” असे रोहितने स्पष्ट केले.

दरम्यान, १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर फाफ डु प्लेसिस याने तुफान फटकेबाजीला सुरुवात केली. पण त्यातच तो यष्टिचीत झाला. षटकात २ चौकार आणि १ षटकार लगावल्यानंतरही त्याने आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काहीही कळण्याआधीच क्विंटन डी कॉक ने त्याला यष्टीचीत करत चेन्नईला पहिला धक्का दिला. डु प्लेसिसने २६ धावा केल्या. संथ खेळी करत खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करताना रैना झेलबाद झाला. त्याने १४ चेंडूत ८ धावा केल्या. आखूड टप्प्याच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना रायडू स्वस्तात झेलबाद झाला. त्याने केवळ १ धाव काढली. त्यानंतर धोनी बाद झाला. पहिली धाव पूर्ण केल्यानंतर खराब क्षेत्ररक्षणामुळे कर्णधार धोनीने दुसरी धाव घेण्याचा विचार केला, पण या दरम्यान ईशान किशनने उत्तम थ्रो करत त्याला धावचीत केले. त्यामुळे धोनीला ८ चेंडूत केवळ २ धावा करून माघारी परतावे लागले.

एका बाजूने गडी बाद असताना शेन वॉटसनचे मात्र संयमी खेळी करत झुंजार अर्धशतक ठोकले. अर्धशतकानंतर त्याने तुफान फटकेबाजी केली. वॉटसनने मलिंगचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे पहिल्या ३ षटकात मलिंगाने तब्बल ४२ धावा खर्च केल्या होत्या. पण अनुभवी असल्याने अंतिम षटकात ९ धावांची गरज असताना मलिंगा पुन्हा गोलंदाजीची आला. चेन्नईने पहिल्या ३ चेंडूवर ४ धावा काढल्या. पण चौथ्या चेंडूवर मात्र दुहेरी धाव घेताना वॉटसन ८० धावांवर धावचीत झाला. त्यानंतर सामना अत्यंत अटीतटीचा झाला. शेवटच्या चेंडूवर २ धावा हव्या असताना मलिंगाने फलंदाजाला पायचीत करत मुंबईला विजय मिळवून दिला.

त्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. अत्यंत संयमी सुरुवात करणाऱ्या रोहित शर्माने दुसऱ्या षटकात अखेर उत्तुंग असा पहिला षटकार लगावला. महत्वाचे म्हणजे हा षटकार लगावल्यानंतर चेंडू गायब झाला. त्यामुळे सामन्यात नवा चेंडू घेण्यात आला. रोहितने पहिला षटकार लगावल्यानंतर पुढच्याच षटकात क्विंटन डी कॉकने दीपक चहरचा समाचार घेतला. त्याने त्याच्या एकाच षटकात तब्बल ३ षटकार लगावले. ४ षटकार फटकावल्यानंतर एक आखूड टप्प्याचा चेंडू टोलवताना सलामीवीर डी कॉक झेलबाद झाला आणि मुंबईला पहिला धक्का बसला. त्याने १७ चेंडूत २९ धावा केल्या. डी कॉक पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माही झेलबाद झाला आणि मुंबईला दुसरा धक्का बसला. रोहितने १ चौकार आणि १ षटकार खेचत चांगली सुरुवात केली होती, पण मोठा फटका खेळताना त्याचा अंदाज चुकला आणि तो बाद झाला. त्याने १५ धावा केल्या.

प्ले ऑफ्स च्या पहिल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध मुंबईला विजय मिळवून देणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात स्वस्तात त्रिफळाचीत झाला. त्याने १५ धावा केल्या. फलंदाजीच्या क्रमवारीत बढती मिळालेल्या कृणाल पांड्याला लवकर माघारी परतावे लागले. त्याने केवळ ७ धावा केल्या. खेळपट्टीवर स्थिरावलेला ईशान किशन मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. त्याने २६ चेंडूत २३ धावा केल्या. यात ३ चौकारांचा समावेश होता. मोठे फटके खेळणारा हार्दिक पांड्या पायचीत झाला. पांड्याने DRS ची मदत घेतली, पण तरीही तिसऱ्या पंचांनी त्याला बादच ठरवले. हार्दिकने १६ धावा केल्या. अखेर Birthday Boy कायरन पोलार्डने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत मुंबईला १४९ धावांपर्यंत पोहोचवले. पोलार्डने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २५ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या.