IPL 2019 KKR vs MI : कोलकाताच्या मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबईला कोलकाताकडून ३४ धावांनी हार पत्करावी लागली. रसलच्या (८०*) फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताने मुंबईपुढे २३३ धावांचे महाकाय लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने प्रयत्नांची शर्थ करत ९१ धावांची खेळी केली. पण त्याची झुंज अपयशी ठरली.

रसल IPL 2019 चा ‘सिक्सर किंग’; केला हा पराक्रम

या सामन्यात रसलने तुफान फटकेबाजी केली. त्याने ४० चेंडूत नाबाद ८० धावा ठोकल्या. यात त्याने ६ चौकार आणि तब्बल ८ षटकार लगावले. या षटकारांच्या आतषबाजीमुळेच रसलने यंदाच्या हंगामात षटकारांचे अर्धशतक पूर्ण केले. त्याची फटकेबाजी पाहून स्टेडियममध्ये बसलेली रसलची पत्नीदेखील खुश झाली. इतकेच नव्हे तर रसलच्या पत्नीने सामना संपल्यानंतर त्याची मुलाखतदेखील घेतली. या मुलाखतीत रसलने पत्नीचं माझी लकी चार्म असल्याचं कबूल केलं.

सामन्यानंतर रसलच्या पत्नीने त्याची खेळकर पद्धतीची मुलाखत घेतली. या मुलाखतीत रसलने आपल्या तुफानी खेळीमागील गुपित सांगितलं. मला फटकेबाजी करत खेळायला आवडते. प्रत्येक सामन्यात मला माझ्या पत्नीला माझी खेळी दाखवून ‘इम्प्रेस’ करायचं असतं, म्हणून मी फटकेबाजी करतो, असं रसल म्हणाला. यानंतर त्याच्या पत्नीने त्याला विचारले की तुझी पत्नी ही तुझी लकी चार्म आहे का? त्यावर रसलने निःशंकपणे ‘हो’ असं उत्तर दिलं.

हा पहा व्हिडीओ –

दरम्यान, २३३ धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करणारा क्विंटन डी कॉक झेलबाद झाला. सुरुवातीपासूनच फटकेबाजी आवश्यक असल्याचे समजून घेत त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो भोपळाही न फोडता माघारी परतला. कर्णधार रोहित शर्मा पायचीत झाला. मैदानावरील पंचांनी त्याला बाद ठरवल्यानंतर त्याने DRS ची मदत घेतली. पण त्यात पंचांचा निर्णय तिसऱ्या पंचांना मान्य असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुंबईचा रिव्ह्यू वाचला, पण रोहितला मात्र तंबूचा रस्ता धरावा लागला.

डावखुरा फलंदाज एवीन लुईस याने फटकेबाजीचा प्रयत्न केला, पण रसलच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्याने १६ चेंडूत १५ धावा केल्या. धावगती वाढवण्याच्या दृष्टीने सूर्यकुमार यादवने पुढाकार घेतला आणि मोठे फटके खेळण्यास सुरुवात केली. पण याचदरम्यान रसलच्या कंटूर गोलंदाजीमुळे तो झेलबाद झाला. सूर्यकुमार यादवने १४ चेंडूत २६ धावा केल्या. तुफान फटकेबाजीच्या जोरावर हार्दिक पांड्याने ३४ चेंडूत ९१ धावा केल्या. यात ६ चौकार आणि ९ षटकार यांचा समावेश होता. याच फटकेबाजीच्या प्रयत्नात तो माघारी परतला.

IPL 2019 : हार्दिक पांड्याचा तडाखा; रचला ‘हा’ इतिहास

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या कोलकात्याच्या गोलंदाजांनी मुंबईवर पूर्णपणे वर्चस्व मिळवले. गिल, लिन आणि रसेल यांनी मैदानात चौफेर फटकेबाजी करत मुंबईच्या गोलंदाजांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. शुभमन गिलने ४५ चेंडूत ७६ धावांची खेळी करत पुन्हा एकदा आपली उपयुक्तता दाखवून दिली. ख्रिस लिन आणि शुभमन गिल जोडीने पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. अर्धशतक झाल्यावर राहुल चहरने लिनचा अडसर दूर केला.

त्यानंतर मैदानावर आलेल्या आंद्रे रसलने गिलच्या साथीने फटकेबाजी केली आणि संघाची बाजू भक्कम केली. दोन्ही फलंदाजांनी पुन्हा एकदा मुंबईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर गिल माघारी परतल्यानंतर कार्तिकच्या साथीने रसेलने आपलं अर्धशतक साजरं केलं. रसलने ४० चेंडूत नाबाद ८० धावा ठोकल्या. मुंबईकडून हार्दिक पांड्या आणि राहुल चहरने १-१ बळी घेतला.