ख्रिस गेल, लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने घरच्या मैदानावर खेळत असताना, मुंबई इंडियन्सवर ८ गडी राखून मात केली. मुंबईने दिलेले १७७ धावांचे आव्हान पंजाबच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केले. पंजाबकडूल सलामीवीर लोकेश राहुलने सर्वाधिक ७१ धावा केल्या. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. या बरोबरच पंजाबने मोहालीच्या मैदानावर तब्बल ८ वर्षांनी मुंबईला पराभूत केले. २०११ पासून मुंबईला मोहालीच्या मैदानावर पंजाबने पराभूत केले नव्हते.

दरम्यान, पंजाबच्या फलंदाजांना सुरुवातीला धक्के देण्यात मुंबईचे गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. गेल आणि राहुल जोडीने ५३ धावांची भागीदारी करत संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. यानंतर ख्रिस गेलला माघारी धाडण्यात कृणाल पांड्याला यश आलं. मात्र त्यानंतरही लोकेश राहुलने आधी मयांक अग्रवाल आणि नंतर डेव्हिड मिलरच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. राहुलने नाबाद ७१ धावा केल्या. मुंबईकडून कृणाल पांड्याने २ बळी घेतले. याव्यतिरीक्त एकाही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही.

त्याआधी,पंजाबच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी केलेल्या पुनरागमनामुळे मुंबईचा संघ सामन्यात मोठी मजल मारु शकला नाही. सलामीवीर क्विंटन डी-कॉक आणि रोहित शर्मा यांनी आश्वासक सुरुवात केल्यानंतरही मुंबईचा संघ १७६ धावांपर्यंतच मजल मारु शकला. क्विंटन डी-कॉकने ६० धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला रोहित शर्माने चांगली साथ दिली. रोहित आणि डी-कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. मात्र रोहित शर्मा आणि डी-कॉक ठराविक अंतराने माघारी परतल्यानंतर उर्वरित फलंदाजांना पंजाबच्या गोलंदाजांनी झटपट माघारी धाडलं. सूर्यकुमार यादव, युवराज सिंह, कायरन पोलार्ड मोठे फटके खेळण्याच्या नादात माघारी परतले. अखेरच्या षटकांमध्ये पांड्या बंधूनी फटकेबाजी करत मुंबईला १७६ धावांपर्यंत मजल मारुन दिली. पंजाबकडून मुरगन आश्विन, मोहम्मद शमी आणि विल्जोएन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्यांना अँड्रू टायने १ बळी घेत चांगली साथ दिली.