आयपीएलच्या बाराव्या हंगामात अंतिम फेरी गाठण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघांमध्ये आज सामना रंगणार आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नईवर मात करत आपलं अंतिम फेरीतलं स्थान नक्की केलं. तर दुसऱ्या एलिमिनेटर सामन्यात दिल्लीने हैदराबादवर मात करत, आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. चेन्नईच्या संघाकडे अनुभवी खेळाडूंची फौज आहे, तर दिल्लीच्या संघात यंदा तरुण खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे ‘करो या मरो’ च्या सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारेल याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे.

Loksatta.com ने यासंदर्भात आपल्या वाचकांनाा, दिल्ली विरुद्ध चेन्नई सामन्यात कोण बाजी मारेल असा प्रश्न विचारला होता. याला भरभरुन प्रतिसाद देत वाचकांनी चेन्नईच्या बाजूने आपला कौल दिला आहे.

चेन्नईच्या बाजूने ५४ टक्के लोकांनी कौल दिला असून ४६ टक्के लोकांनी दिल्लीला पसंती दिली आहे. दिल्लीच्या संघाने यंदाच्या हंगामात अनेक मातब्बर संघांना पराभवाचा धक्का दिला आहे. तर चेन्नईच्या संघाने आपला फॉर्म कायम राखत सर्वात पहिले बाद फेरीत प्रवेश मिळवला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.