IPL 2019 : वानखेडे मैदानावर झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईने कोलकाताला ९ गडी राखून पराभूत केले. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत चेन्नईला खाली ढकलून अव्वल स्थान पटकावले. मुंबईकडून पराभूत झाल्यामुळे कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तर हैदराबादला प्ले-ऑफ्स फेरीत स्थान मिळाले. पण मुंबईने पहिले स्थान पटकावल्यामुळे आता ‘प्ले ऑफ्स’ फेरीत मुंबई आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना रंगणार आहे.

हे वाचा – IPL 2019 : असे असतील ‘प्ले ऑफ्स’चे सामने

IPL 2019 मध्ये चेन्नईविरुद्ध मुंबई २-० ने आघाडीवर

या स्पर्धेत मुंबई आणि चेन्नई दोन वेळा आमने सामने आले. या दोनही सामन्यात मुंबईने चेन्नईवर विजय मिळवला. ३ एप्रिलला हे दोन संघ पहिल्यांदा या स्पर्धेत आमने सामने आले होते. त्यावेळी जेसन बेहरनडॉर्फ, लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्याने केलेल्या माऱ्याच्या जोरावर मुंबईने घरच्या मैदानावर विजयाची नोंद केली होती. इतकेच नव्हे तर चेन्नई सुपरकिंग्जवर ३७ धावांनी मात करत मुंबईने IPL 2019 मधील चेन्नईची विजयाची मालिका खंडीत केली होती.

दुसऱ्या वेळी हे दोन संघ स्पर्धेत आमने सामने आले असताना मुंबईने चेन्नईला घरच्या मैदानावर पराभूत केले. यंदाच्या हंगामात चेन्नईला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करणारा मुंबई पहिलाच संघ ठरला. रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी अर्धशतकी (६७) खेळी करत मुंबईला १५५ धावांपर्यंत पोहोचवले आणि चेन्नईपुढे १५६ धावांचे आव्हान ठेवले. पण या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला केवळ १०९ धावाच करता आल्या.

IPL चा इतिहास मुंबईच्या बाजूने

मुंबई आणि चेन्नई यांच्यात झालेल्या एकूण २६ सामन्यांमध्येही मुंबईच पुढे आहे. या सामन्यांपैकी मुंबईने १५ सामने जिंकले आहेत, तर ११ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला. याशिवाय चेन्नईच्या मैदानावर झालेल्या मुंबई चेन्नई सामन्यातही मुंबईने ४-२ अशी आघाडी राखली आहे.

मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांनी या हंगामाची सुरुवात चांगली केली होती. पण मधल्या सामन्यात काही पराभव पत्करावे लागल्याने दोनही संघ थोडे अडखळले. पण अखेर चेन्नईने सर्वप्रथम प्ले ऑफ्स फेरी गाठली. पंजाबविरुद्ध शेवटचा साखळी सामना पराभूत होऊनही चेन्नईचा संघ गुणतालिकेत अव्वल होता. पण मुंबईने कोलकाताला धूळ चारत गुणतालिकेत अग्रक्रम पटकावला.

आता पहिला प्ले ऑफ्स सामना चेन्नईमध्ये होणार आहे. त्यामुळे या सामन्यात मुंबई इतिहासाची पुनरावृत्ती करणार की चेन्नई नव्या इतिहासाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.