शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला १ धावेने पराभूत केले आणि IPL विजेतेपदाचा चौकार लगावला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला १५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला एका चेंडूंत २ धावा हव्या होत्या. पण अनुभवी लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. अटीतटीच्या या लढतीत राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांची गोलंदाजीही अत्यंत निर्णायक ठरली.

१५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर फाफ डु प्लेसिस याने तुफान फटकेबाजीला सुरुवात केली. पण त्यातच तो यष्टिचीत झाला. षटकात २ चौकार आणि १ षटकार लगावल्यानंतरही त्याने आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काहीही कळण्याआधीच क्विंटन डी कॉक ने त्याला यष्टीचीत करत चेन्नईला पहिला धक्का दिला. डु प्लेसिसने २६ धावा केल्या. संथ खेळी करत खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करताना रैना झेलबाद झाला. त्याने १४ चेंडूत ८ धावा केल्या. आखूड टप्प्याच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना रायडू स्वस्तात झेलबाद झाला. त्याने केवळ १ धाव काढली. पहिली धाव पूर्ण केल्यानंतर खराब क्षेत्ररक्षणामुळे कर्णधार धोनीने दुसरी धाव घेण्याचा विचार केला, पण ईशान किशनने उत्तम थ्रो करत त्याला धावचीत केले. धोनीने ८ चेंडूत २ धावा केल्या.

एका बाजूने गडी बाद असताना शेन वॉटसनचे मात्र संयमी खेळी करत झुंजार अर्धशतक ठोकले. अर्धशतकानंतर त्याने तुफान फटकेबाजी केली पण दुहेरी धाव घेताना तो ८० धावांवर धावचीत झाला. नंतर सामना अत्यंत अटीतटीचा झाला. शेवटच्या चेंडूवर २ धावा हव्या असताना मलिंगाने फलंदाजाला पायचीत करत मुंबईला विजय मिळवून दिला.

दरम्यान अंतिम सामन्यात दोन्ही संघातल्या खेळाडूंनी काही विक्रमांची नोंद केली.

१) आयपीएलच्या इतिहासात गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावणाऱ्या संघाने विजेतेपद पटकावण्याची ही तिसरी वेळ ठरली. याआधी २००८ साली राजस्थान रॉयल्स तर २०१७ साली मुंबई इंडियन्सने अशी कामगिरी करुन दाखवली आहे.

२) आयपीएलच्या १२ पैकी ९ हंगामांच्या अंतिम सामन्यात, नाणेफेक जिंकलेल्या कर्णधाराने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं.

३) आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळणारा इम्रान ताहीर पहिला ४० वर्षीय खेळाडू ठरला आहे.

४) पर्पल कॅप (सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला मिळणारा बहुमान) मिळवणारा इम्रान ताहीर दुसरा फिरकीपटू ठरला आहे. याआधी २०१० साली प्रग्यान ओझाने अशी कामगिरी करुन दाखवली होती.

५) इम्रान ताहीरने २६ बळी घेत एका हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या फिरकीपटूंच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे. त्याने सुनील नरील आणि हरभजन सिंह यांच्या नावावर असलेला २४ बळींचा विक्रम मोडला.

६) महेंद्रसिंह धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी टिपणारा यष्टीरक्षक ठरला आहे. त्याने कोलकात्याच्या दिनेश कार्तिकचा १३१ बळींचा विक्रम मोडला आहे.

७) ज्यावेळी मुंबईचा संघ अंतिम फेरीत पोहचला आहे, त्यावेळी धोनी त्यांच्या विरोधी संघात होता. (२०१०, २०१३, २०१५, २०१९ – चेन्नई आणि २०१७ पुणे)

८) आयपीएलच्या अंतिम सामन्यात १५० किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येचा यशस्वी पद्धतीने डिफेंड करणारा चौथा संघ ठरलाय.