दिल्ली कॅपिटल्स संघावर मात करुन चेन्नईने आयपीएलच्या बाराव्या हंगामात अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. अंतिम फेरीत प्रवेश करण्याची चेन्नईची ही आठवी वेळ ठरली आहे. दिल्लीने दिलेलं १४८ धावांचं आव्हान चेन्नईने ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. सामना संपल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चेन्नईच्या विजयाचं श्रेय गोलंदाजांना दिलं आहे.

“गोलंदाजीदरम्यान विकेट घेत राहणं हे महत्वाचं होतं. याचं श्रेय मी पूर्णपणे गोलंदाजांना देईन. नेमकं काय हवं आहे हे कर्णधार खेळाडूंना सांगू शकतो. त्यावर कसं काम करायचं आणि गोलंदाजी कशी करायची हे सर्व गोलंदाजांवर अवलंबून असतं, आणि गोलंदाजांनी त्यांची कामगिरी चोख बजावली.” सामना संपल्यानंतर धोनीने आपली बाजू मांडली.

अवश्य वाचा – IPL 2019 : चेन्नईची यशस्वी घौडदौड, नोंदवलं विजयाचं शतक

दरम्यान, १४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीची षटके जपून खेळल्यानंतर फाफ डु प्लेसिस आणि वॉटसन यांनी चेन्नईला धमाकेदार सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी आठव्या षटकात चेन्नईला अर्धशतकी सलामी करून दिली. यात डु प्लेसिसने फटकेबाजी केली, तर वॉटसनने संयमी पवित्रा राखला. आपली फटकेबाजी सुरु ठेवत फाफ डु प्लेसिस याने दमदार अर्धशतक पूर्ण केले. यासाठी त्याने ३७ चेंडू खेळले. डु प्लेसिसने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लगेचच चेन्नईला धक्का बसला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात डु प्लेसिस झेलबाद झाला. त्याने ३९ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार लगावत ५० धावा केल्या. त्याने वॉटसन बरोबर ८१ धावांची सलामी दिली.

आधी संयमी खेळी आणि नंतर तुफानी अर्धशतक ठोकल्यानंतर शेन वॉटसन माघारी परतला. त्याने ३ चौकार आणि ४ षटकार यांच्या मदतीने ३२ चेंडूत ५० धावा केल्या. पाठोपाठ बाचकत फलंदाजी करणारा सुरेश रैनाही स्वस्तात तंबूत परतला. त्याने केवळ ११ धावा केल्या. विजयासाठी २ धावा आवश्यक असताना धोनीला विजयी षटकार मारण्याचा मोह आवरला. त्यातच तो बाद झाला. अखेर रायडूने विजयी फटका लगावत विजयाची औपचारिकता पूर्ण केले.