आयपीएलच्या बाराव्या हंगामात राजस्थान रॉयल्सने मोठा निर्णय घेतला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेची कर्णधारपदावरुन उचलबांगडी करण्यात आलेली असून, उर्वरित पर्वासाठी स्टिव्ह स्मिथकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली राजस्थानचा संघ यंदाच्या हंगामात अवघे दोन सामने जिंकला आहे.

गुणतालिकेतही राजस्थानचा संघ सातव्या स्थानावर आहे. फलंदाजीमध्ये अजिंक्यला आपली छाप पाडता आलेली नाहीये. त्यामुळे संघाला नवीन दिशा देऊ शकेल अशा कर्णधाराची गरज असल्याचं संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केलं आहे. “स्टिव्ह स्मिथ हा राजस्थानच्या संघाचा अविभाज्य भाग आहे. रहाणेचं संघातलं स्थान कायम राहणार आहे. मात्र उर्वरित सामन्यांमध्ये संघाची कामगिरी सुधारण्यासाठी हा बदल गरजेचा आहे.” राजस्थानच्या संघमालकांनी आपली बाजू स्पष्ट केली.