IPL 2019 RCB vs CSK : अंतिम चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या अटीतटीच्या सामन्यात बंगळुरूच्या संघाने चेन्नईला एका धावेने पराभूत केले. शेवटच्या षटकात आवश्यक असलेल्या २६ धावांचा पाठलाग करताना धोनीने ५ चेंडूत २४ धावा फटकावल्या. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकाकी झुंज देत ४८ चेंडूत ८४ धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. अखेरच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना यष्टीरक्षक पार्थिव पटेल याने शार्दूल ठाकूरला चपळाईने बाद केले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेली अर्धशतकी खेळी आणि अप्रतिम निर्णायक धावचीत यामुळे तो बंगळुरूच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मात्र त्यानेही महेंद्रसिंग धोनीच्या खेळीची स्तुती केली. तो म्हणाला की शेवटचा चेंडू टाकण्याआधी आमच्या मनात हे पक्के होते की धोनीने चेंडू उजव्या बाजूने मारावा, कारण त्या बाजूची सीमारेषा कमी अंतराची होती. जर त्याने डाव्या बाजूला फटका लगावला असता, तर ज्या वेगाने धोनी धावतो त्यानुसार २ धावा रोखणे आम्हाला अशक्यप्राय होते. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे धोनी त्या चेंडूला बॅट लावू शकणार नाही असे आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते. A measured 53 (36) Last ball run-out hero @parthiv9 is the deserved Man of the match for #RCBvCSK pic.twitter.com/uYje94WG3W— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2019 मुंबई किंवा बंगळुरूच्या मैदानावर शेवटच्या ५ षटकात ७० धावा होऊ शकतात. त्यामुळे बचावासाठी तुम्हाला ८० ते ९० धावा असणे महत्वाचे असते. धोनीने तुफान फटकेबाजी करून सामना खेचून शेवटच्या चेंडूपर्यंत आणला होताच. त्यामुळे शेवटचा चेंडू हा ऑफ बाजूला आणि संथ गतीने असावा अशी आमची योजना होती, पण तो चेंडू धोनी हुकला हे आमच्यासाठी पथ्यावरच पडले, असेही पार्थिव पटेल म्हणाला. Unreal stuff at the Chinnaswamy stadium as @RCBTweets keep the fight going #RCBvCSK pic.twitter.com/drxLIP5nzf— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2019 दरम्यान, १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या डावाची सुरुवात खराब झाली.आधी वॉटसन ५ धावांवर झेलबाद झाला. पुढच्याच चेंडूवर स्टेनने रैनाचा (०) त्रिफळा उडवला. सलामीवीर फाफ डु प्लेसिस मोठा फटका खेळण्यासाठी सरसावला, पण तो फटका चुकला आणि डु प्लेसिस ५ धावांवर माघारी परतला. डु प्लेसिस सारखाच फटका खेळून केदार जाधवही तंबूत परतला आणि चेन्नईला २८ या धावसंख्येवर चौथा धक्का बसला. केदारने ९ धावा केल्या. धोनीने अप्रतिम फटकेबाजी केली, पण अखेर एका धावेने हा सामना बंगळुरूने जिंकला. Unbelievable scenes in Bengaluru!@RCBTweets win by 1 run in an absolutely thrilling last over #RCBvCSK pic.twitter.com/6Q4sQt9Jkh— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2019 चार गडी झटपट बाद झाल्यानंतर अंबाती रायडूने धोनीच्या साथीने डाव सावरला, पण विजयासाठी आवश्यक असलेली धावगती गाठण्यासाठी त्याने फटकेबाजीचा पर्याय स्वीकारला. त्यातच २ चौकार आणि १ षटकार लगावून तो २९ धावांवर माघारी परतला. या दोघांनी मिळून ५५ धावांची भागीदारी केली. धोनी आणि रवींद्र जाडेजा यांच्यात भागीदारी होत असतानाच जाडेजा धावचीत झाला आणि चेन्नईला सहावा धक्का बसला. जाडेजाने ११ धावा केल्या. एकीकडे फलंदाज बाद होताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एक बाजू लावून धरली. ३५ चेंडूत त्याने धडाकेबाज अर्धशतक ठोकले. निर्णायक क्षणी ब्राव्हो झेलबाद झाला. त्याने केवळ ५ धावा केल्या. त्याआधी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुच्या फलंदाजांनी निराशा केली. मात्र पार्थिव पटेल आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांनी संयम राखत फटकेबाजी करुन संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. त्याने ३७ चेंडूत ५३ धावा केल्या. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला झटपट माघारी धाडण्यात चेन्नईचे गोलंदाज यशस्वी ठरले. दिपक चहरने कोहलीला माघारी धाडलं. यानंतर एबी डिव्हीलियर्स, अक्षदीप नाथ, स्टॉयनिस यांनी थोड्या-थोड्या कालावधीसाठी पार्थिव पटेलला चांगली साथ दिली. मात्र मोठी खेळी करण्यात ते अपयशी ठरले. चेन्नईकडून दिपक चहर-शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. इम्रान ताहीरने एका फलंदाजाला बाद केलं.