कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. कोलकात्याने विजयासाठी दिलेलं २३३ धावांचं आव्हान पार करताना मुंबईचा संघ १९८ धावांपर्यंत मजल मारु शकला. हार्दिक पांड्याने ३४ चेंडूत ६ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ९१ धावांची खेळी केली. मात्र त्याच्या या खेळीनंतरही मुंबईचा संघ ३४ धावांनी पराभूत झाला. या सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला सामनाधिकाऱ्यांनी दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : ऋषभ पंतचा मोठा विक्रम, कुमार संगकाराला टाकलं मागे

रोहित शर्माच्या मानधनातली १५ टक्के रक्कम कापून घेण्यात आली आहे. २३३ धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. हॅरी गुर्नेच्या गोलंदाजीवर रोहित यष्टीचीत असल्याचं अपील करण्यात आलं. पंच नितीन मेमन यांनी हे अपील उचलून धरत रोहित बाद असल्याचा निर्णय घेतला. याविरोधात रोहितने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तिसऱ्या पंचांच्या पाहणीत बॉल लेग स्टम्पला लागत असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे ‘अंपायर्स कॉल’ प्रमाणे रोहितला बाद ठरवण्यात आलं. यावेळी रोहितने रागाच्या भरात आपल्या बॅटने स्टम्प तोडला.

सामनाधिकाऱ्यांसमोर सुनावणीमध्ये रोहितने आपली चूक मान्य केली आहे. कर्णधार या नात्याने रोहितचा ईडन गार्डन्स मैदानावर हा शंभरावा सामना होता. या सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.

अवश्य वाचा – ईडन गार्डन्स आणि रोहित शर्माचं हे अनोखं नातं माहिती आहे का?