मुंबई इंडियन्स हा संघ IPL मध्ये कायम लोकप्रिय संघांपैकी एक असतो. या संघाने ११ हंगामांमध्ये ३ विजेतेपदे जिंकली आहेत. यात महत्वाची बाब म्हणजे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याचे विजयात मोठे योगदान आहे. त्यामुळे मुंबईने अनेक धडाकेबाज सामने जिंकून IPL मध्ये आणि चाहत्यांच्या मनामध्ये आपली एक वेगळी जागा तयार केली आहे. यंदाच्या वर्षीदेखील मुंबईच्या संघ IPL जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. मुंबईच्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा याने एक महत्वाचा आणि मोठा निर्णय जाहीर केला आहे.

गेल्या काही हंगामात मुंबईच्या संघाची मधली फळी काहीशी कमकुवत दिसून आली. त्यामुळे रोहित शर्माने स्वतःला सलामीवीर न खेळवत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस ढकलले होते. पण आता मुंबईच्या ‘हिटमॅन’ने महत्वाची घोषणा केली आहे. युवराज सिंग याला संघात घेण्यात आले आहे. त्याशिवाय इतरही काही खेळाडूंची गेल्या वर्षभरातील कामगिरी चांगली झाली आहे. त्यामुळे रोहितला काहीसा दिलासा मिळाला असून रोहित शर्मा IPL मध्ये सलामीवीर म्हणूनच फलंदाजीस येणार आहे. मुंबई इंडियन्सने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

आम्ही गेल्या काही वर्षांपासून IPL मध्ये उत्तम खेळ खेळत आहोत. पण तुम्हाला तुमच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देणेदेखील तितकेच गरजेचे असते. जर मला विश्रांतीची गरज भासली, तर मी नक्कीच विश्रांती घेईन. आम्ही जगातील सर्वात रोमांचक अशी स्पर्धा खेळत आहोत, त्यामुळे कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे हे आम्हाला माहिती आहे. या वर्षीच्या सर्व सामन्यांमध्ये मी सलामीवीर म्हणून फलंदाजीसाठी येणार आहे. आमच्या संघात अनुभवी आणि नव्या दमाच्या खेळाडूंचा चांगला समतोल आहे. परदेशी खेळाडूंनी आतापर्यंत बऱ्याच हंगामात आम्हाला सामने जिंकवून दिले आहेत, पण आमचा मूळ हेतू हा संघातील ७ भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली व्हावी, हाच असेल, असे रोहितने स्पष्ट केले.

मुंबईचे वानखेडे मैदानावरील सामने –
२४ मार्च : मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई
३ एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई
१० एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई
१३ एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई
१५ एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई
२ मे : मुंबई इंडियन्स वि. सनराइझर्स हैदराबाद, मुंबई
५ मे : मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, मुंबई