IPL 2019 MI vs RCB : मुंबईच्या वानखेडे मैदानावर एबी डीव्हिलियर्स (७५) आणि मोईन अली (५०) यांच्या अर्धशतकाच्या बळावर बंगळुरूने ७ बाद १७१ धावा केल्या आणि मुंबईला १७२ धावांचे आव्हान दिले. कर्णधार रोहित शर्माने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या डावात डीव्हिलियर्सच्या फटकेबाजीची चर्चा रंगली, पण त्यासोबतच चर्चा झाली ती पोलार्डने डीव्हिलियर्सला केलेल्या अफलातून रन-आऊटची…

शेवटच्या षटकात तुफान फटकेबाजी करण्याचा मानस डीव्हिलियर्सचा होता. त्यानुसार त्याने पहिल्या चेंडूवर षटकार लगावला. पण दुसऱ्या चेंडूवर त्याला मोठा फटका खेळता आला नाही. चेंडू सीमारेषेवर आलेल्या पोलार्डकडे गेला. पोलार्डने सीमारेषेवरूनच चेंडू फेकला, तो थेट स्टंपवर लागला. त्यावेळी डीव्हिलियर्स धाव घेण्याची हुल देत होता. या अतिआत्मविश्वासामुळे तो क्रीजच्या बाहेरच राहिला आणि पोलार्डने अप्रतिम रन-आऊट केला.

दरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली हा स्विंग होणाऱ्या चेंडूवर झेलबाद झाला. जेसन बेहरनडॉर्फ याने त्याला एका चौकारासह ९ धावांवर माघारी धाडले. डावखुरा सलामीवीर पार्थिव पटेल चांगली फटकेबाजी करत होता, पण हार्दिक पांड्याने त्याला माघारी धाडले. पार्थिवने २० चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार खेचत २८ धावा केल्या. एबी डीव्हिलियर्स आणि मोईन अली या जोडीने बंगळुरूच्या डाव सावरला. त्यामुळे बंगळुरूला १४ व्या षटकात शतकी मजल मारता आली. डीव्हिलयर्स आणि मोईन अली या दोघांनी फटकेबाजी करून आपली अर्धशतके पूर्ण केली. पण अर्धशतकानंतर लगेचच मोईन अली माघारी गेला. अलीने ३५ चेंडूत ५० धावा केल्या. क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या पोलार्डने सीमारेषेवरून अप्रतिम थ्रो केला. तो चेंडू थेट स्टंपवर लागला आणि डीव्हिलियर्स धावचीत झाला. त्याने ५१ चेंडूत ७५ धावांची झंझावाती खेळी केली. शेवटच्या षटकात बंगळुरूचा डाव गडगडला. मलिंगाने चतुराईने केलेल्या गोलंदाजीमुळे त्या षटकात केवळ ८ धावा खर्च झाल्या तर ३ बळी मिळाले.