दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात, मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघावर ४० धावांनी मात करत आपल्या पराभवाचा वचपा काढला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या मुंबईची मधल्या षटकांमध्ये दयनीय अवस्था झाली होती. मात्र हार्दिक आणि कृणाल पांड्या जोडीने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत आपल्या संघाला १६८ धावांचा आश्वासक टप्पा गाठून दिला.

आयपीएलच्या बाराव्या हंगामात हार्दिक पांड्याने आतापर्यंत अनेकदा महेंद्रसिंह धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटची नक्कल केली आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही पांड्याने अशाच प्रकारे हेलिकॉप्टर शॉट खेळत उपस्थित प्रेक्षकांची पसंती मिळवली. सामन्यात अखेरच्या षटकामध्ये रबाडाच्या गोलंदाजीवर पांड्याने हा षटकार खेचला. हा फटका पाहून डगआऊटमध्ये बसलेल्या पोलार्डनेही पांड्याचं कौतुक केलं.

दरम्यान, शिखर धवन आणि पृथ्वी शॉ जोडीने दिल्लीच्या डावाची चांगली सुरुवात केली. मात्र राहुल चहरने दिल्लीच्या डावाला खिंडार पाडलं. धवन आणि पृथ्वी शॉ माघारी परतल्यानंतर दिल्लीच्या डावाला गळती लागली. एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांनी आपल्या आक्रमणाची धार धारदार करत दिल्लीचा बॅकफूटला ढकललं. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, कॉलिन मुनरो हे फलंदाज आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकले नाहीत.

अखेरच्या फळीत अक्षर पटेल आणि ख्रिस मॉरिस यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दिल्लीसमोरचं आव्हान हे अशक्यप्राय अवस्थेत गेलं होतं. अखेरीस मुंबईने धावांनी विजय मिळवत गुणतालिकेतलं दुसऱ्या स्थानावर उडी मारली आहे. मुंबईकडून राहुल चहरने ३, जसप्रीत बुमराहने २ बळी घेतले. त्यांना लसिथ मलिंगा, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.