बहुप्रतिक्षित IPL 2020ची अधिकृत घोषणा BCCIने ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच केली. युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे हेदेखील स्पष्ट करण्यात आले. ड्रीम ११ला यंदाचे टायटल स्पॉन्सर्स जाहीर करण्यात आले. २० ऑगस्टपासून सर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार सर्व संघ आणि खेळाडू युएईमध्ये दाखलही झाले. त्यानंतर आज एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.

“दुबई, अबु धाबी आणि शारजा अशा तीन ठिकाणी IPLचे सामने आयोजित करण्यासाठी आम्ही आवश्यक त्या परवानगी मिळवल्या आहेत. या स्टेडियमशी संबंधित असलेले स्थानिक प्रशासन या संबंधीचे नियम आणि प्रोटोकॉल तयार करणार आहे. त्यामुळे खेळाडूंना प्रत्येक वेळी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर क्वारंटाइन न करता थेट खेळाच्या ठिकाणी ते हॉटेलमध्ये येणे-जाणे सुकर होणार आहे”, अशी माहिती एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने दिली.

“या सर्व प्रवासांदरम्यान सर्व संघ हे BCCIच्या मार्गदर्शक तत्वानुसार जैव-सुरक्षित बबलमध्ये राहतील. परदेशातून किंवा जैव-सुरक्षित बबलच्या बाहेरून येणाऱ्यांना स्पर्धेसाठी दाखल झाल्यावर क्वारंटाइन व्हावं लागणार आहे. पण जे बबलमध्ये आहेत त्यांना सामन्यांसाठी प्रवास करताना चिंता करण्याची गरज नाही. त्यांना सारखं-सारखं क्वारंटाइन केलं जाणार नाही”, असं बोर्डाने स्पष्ट केलं.