सोमवारी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत, तेराव्या हंगामाच्या अंतिम सामना आणि सामन्यांच्या वेळाबद्दल निर्णय घेण्यात आला. २९ मार्चपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार असून…२४ मे रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यंदाच्या हंगामात अंतिम सामन्याचा मान मुंबईला मिळाला आहे. २०१९ साली झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सचे चेन्नई सुपरकिंग्जवर मात करत विजेतेपद पटकावलं होतं.

अवश्य वाचा – IPL 2020 : सामन्यादरम्यान जखमी खेळाडूंसाठी गव्हर्निंग काऊन्सिलने घेतला मोठा निर्णय

आयपीएलच्या आगामी हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सकडे पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. आयपीएलच्या गत हंगामातील आकडेवारीवर विश्वास ठेवला तर रोहित शर्मा पुन्हा एकदा आयपीएलची ट्रॉफी हातात घेऊ शकतो.

२००९ साली रोहितने डेक्कन चार्जर्स आणि २०१५ साली मुंबई इंडियन्सकडून खेळताना आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही सामने २४ मे रोजीच खेळवण्यात आले होते. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या हंगामाचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे यंदाच्या हंगामात रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.