देशभरात करोना विषाणूचा वाढचा प्रादुर्भाव लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने गुरुवारी याबद्दल आपली अधिकृत भूमिका जाहीर केली. यासंदर्भात गव्हर्निंग काऊन्सिलने एक परिपत्रक जाहीर केलं आहे. यात, परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर स्पर्धा खेळवण्यासाठी योग्य वातावरण असेल तरच आयपीएल खेळवलं जाईल असं म्हटलं आहे.

“या देशातील प्रत्येक नागरिक आणि आयपीएलशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींचं आरोग्य चांगलं रहावं ही सध्या महत्वाची गोष्ट आहे. बीसीसीआय, आयपीएल संघमालक, प्रक्षेपण करणारी वाहिनी व इतर समभागधारक यांच्याशी चर्चा केल्यानंतर, स्पर्धेसाठी योग्य वातावरण तयार झालं तरच आयपीएल खेळवण्याबद्दल विचार केला जाईल”. अशी भूमिका गव्हर्निंग काऊन्सिलने मांडली आहे. बीसीसीआय सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, भविष्यात स्पर्धा सुरु करण्याबाबत विचार झाल्यास केंद्र, राज्य सरकार आणि सर्व संबंधित यंत्रणांशी सल्लामसलत केल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल असंही या परिपत्रकात म्हटलं आहे.

२९ मार्चरोजी आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार होती. मात्र केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केल्यानंतर ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. दरम्यानच्या काळात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सुधारणा न झाल्यामुळे बीसीसीआयने अखेरीस स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार होता.